मुख्यमंत्री : पिचड पिता-पुत्रांच्या प्रवेशामुळे तालुक्यातील सर्वच प्रश्न सोडविणार
अकोले, संगमनेर – पुढील 25 वर्षं मोदी व भाजप सत्तेत राहणार आहे. तेव्हा विरोधी पक्षात असणाऱ्या अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, सुप्रिया सुळे आदींनी विरोधी पक्षनेतेपदाची प्रॅक्टीस सुरु ठेवावी. मात्र, त्यात सातत्य ठेवावे. अन्यथा त्यांना तेही पद मिळले की नाही. हे सांगता येणार नाही. कारण विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक तेवढे आमदार तरी निवडून आणावे लागतील, अशी बोचरी टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केली. महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा आज अकोले येथे फडणवीस यांच्या सभेने सुरू झाला.
तेव्हा ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजीमंत्री मधुकरराव पिचड होते. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार वैभवराव पिचड, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे, रथयात्रेचे संयोजक आमदार सुरजित सिंह ठाकूर, आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुकरराव नवले, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, गटनेते जालिंदर वाकचौरे, हेमलता पिचड, विजय वाकचौरे, संभाजीराव दहातोंडे, शिवाजीराजे धुमाळ, सोनाली नाईकवाडी, वसंत मनकर, गिरजाजी जाधव, भाजपचे संगमनेर तालुकाध्यक्ष काशीनाथ पावसे, निवृत्ती महाराज इंदोरीकर, नवले उद्योग समूहाचे अध्यक्ष साहेबराव नवले, अमित नवले, भाजपाचे युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष ऍड. श्रीराज डेरे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे आदी उपस्थित होते.
निळवंडे धरणाच्या प्रकल्पासाठी बाराशे कोटी रूपयांची तरदुत करण्यात आली. त्यामुळे आपण आता दिड वर्षात निळवंडे प्रकल्प पूर्णत्वास नेऊ, असे ते संगमनेरच्या सभेत म्हणाले. आजची महाजनादेश यात्रेला उपस्थित असणारी मतदारांची गर्दी लक्षात घेता निवडणूक प्रक्रिया जाहीर होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. या आगामी निवडणुकीत महायुती राज्यात सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम दावा करून फडणवीस म्हणाले, आमच्या सभेला मैदानी पुरत नाहीत तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सभांना मंगल कार्यालये ओस पडत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. मधुकरराव पिचड यांचा आदिवासींचे नेते असा गौरव करून वैभवराव पिचड यांनी मागील पाच वर्षांच्या काळामध्ये शिस्तबद्धपणे व शांतपणे विधिमंडळात विधानसभा मतदारसंघातील प्रश्न मांडले. विकासकामांसाठी निधी पदरात पाडून घेतला. हे पितापुत्र पक्षात आल्याने आता मतदारसंघातील सर्वच प्रश्न आगामी काळात सोडवले जातील व पुन्हा दोन वर्षाने अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर येथील नवीन समस्या वगळता बाकीचे सर्व प्रश्न संपले असतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भाषणात फडणवीस यांनी आघाडी सरकार आणि युती सरकारची तुलना केली. ते म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात पंधरा वर्षांमध्ये 20 हजार कोटींचा निधी विकासकामांवर खर्च झाला. युतीच्या काळात पाच वर्षात 50 हजार कोटींचा विकास निधी खर्च पडला. आपल्या सरकारने राज्यांमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे 30 हजार किलोमीटरची कामे सुरु ठेवली असून त्यातील 22 हजार किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय, राज्य, ग्रामीण रस्त्यांचे तालुक्यात काम शिल्लक राहणार नाही, अशी आमदार पिचड यांना ग्वाही देऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधला. राज्यात बेघरांना घर, वीज, पाणी, शौचालय देण्याचे त्यांनी सूतोवाच केले. आदिवासी, विविध शैक्षणिक सोयी, सवलती, आदिवासी विद्यार्थ्यांची वसतीगृह व अन्य माहिती त्यांनी दिली. यामुळे मोठे परिवर्तन आदिवासींच्या बरोबर ओबीसी आणि मराठा समाजात होणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
ना. विखे पाटील यांनी तालुक्यातील जनता ही डाव्या विचाराची आहे. या तालुक्याने मोठ्या कष्टपूर्वक आपला प्रपंच फुलवला आहे. अशा या भागातील कष्टाळू जनतेला विकासाचे पुरेपूर माप त्यांच्या पदरात मुख्यमंत्र्यांनी टाकावे. बहुचर्चित आढळा धरण उंची वाढीची मागणी मुख्यमंत्र्यांनी तडीला न्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आ. वैभवराव पिचड यांनी आपण विरोधात असताना वेगळ्या चष्म्यातून मुख्यमंत्र्यांकडे पाहत होतो. पण जवळ गेल्यावर वेगळे दर्शन घडले, अशी कबुली दिली. कोकणात वाहून जाणारे पूर्वेकडे वळवावे. तोलारखिंड व अन्य विकास कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना शब्द टाकला. यावेळी सीताराम गायकर, मधुकरराव नवले, शिवाजीराजे धुमाळ, गिरजाजी जाधव, वसंत मनकर आदींची यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक सीताराम भांगरे यांनी केले. सूत्रसंचालन जालिंदर वाकचौरे यांनी केले. सभेला मोठी गर्दी होती.