देहूगाव – संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या रथाला यंदा प्रथम जीपीएम प्रणाली बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पालखीतील रथ नेमका कुठे आहे याची अचूक माहिती मिळणार आहे.
श्री संत तुकाराम महाराजांच्या 338 व्या पालखी सोहळ्याचे 10 जूनला प्रस्थान होणार आहे. यासाठी संस्थानकडून जय्यत तयारी सुरू आहे. पालखीसाठीच्या रथाची दुरुस्ती व डागडुजी करण्यात येणार आहे. यावर्षी रथाला जादा क्षमतेचे आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच रथाला जीपीएस प्रणालीही जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पालखीच्या मार्गावर रथ नेमका कोठे आहे याची अचूक माहिती मिळणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिंड्यासोबत असलेल्या दोनच वाहनांना पास देण्यात येणार आहे. ते पालखी सोहळ्याच्या पूर्वी संबंधित दिंडीचालक संस्थानच्या कार्यालयातून घेऊन जातील, अशी माहिती यावेळी संस्थानच्यावतीने देण्यात आली. या पालखी सोहळ्याच्या तयारीला श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. सोहळ्याच्या कामांनी वेग घेतला असून, पालखी सोहळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी धावपळ सुरू आहे.
मंदिराच्या परिसरातील किरकोळ डागडुजीची कामे उरकण्यात आली आहेत. तसेच राहिलेली किरकोळ कामे एक-दोन दिवसात संपतील. संस्थानच्या वतीने शासकीय पत्रव्यवहार करण्यात आला असून, शासनाच्या सर्व कार्यालयांशी चर्चादेखील सुरू आहे. याबाबत दिंडी चालक-मालक व फडकरी यांच्याशी देखील पत्रव्यवहार झालेला आहे. पालखी सोहळ्याचा कार्यक्रम त्यांनादेखील पाठविण्यात आलेला आहे. त्यामुळे संबंधित दिंड्या वेळेत देहूत दाखल होण्यास मदत होणार आहे. दिंडी चालकांना वारीदरम्यान गॅस व रॉकेल यांचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने सोहळ्याच्या पूर्वी संबंधित दिंडीचालक शासनाच्या पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार झाला असून, पालखी मार्गावरील सर्व संबंधित वितरकांना संबंधित विभागांकडून सूचना दिल्या जातील. पालखी सोहळ्यासोबत वारी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक असावे या संदर्भातही चर्चा झाली असून, तसा पत्रव्यवहारही पूर्ण झाला आहे.
यंदा निर्मलवारी संकल्पनेतून एक हजार फिरती शौचालये उपलब्ध होणार आहेत. मंदिराच्या सर्व भिंतींना स्टोन पॉलिश करण्यात आलेले आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या समोरील मुख्य होळकर मंडप व चौघडा घराच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. यासाठी लागणाऱ्या लाकडावर नक्षीकाम सुरु आहे. त्यामुळे जुना लाकडी होळकर मंडप व चौघडा घराचे रूपडे पालटणार आहे. यासाठी काही कालावधी लागणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे यांनी दिली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संतोष महाराज मोरे उपस्थित होते.
यंदा दिंड्यांची संख्या वाढण्याची शक्यता
दरवर्षी पालखी सोहळ्यामध्ये 329 दिंड्या सहभागी होतात. मात्र यंदा दिंड्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यदा अंदाजे 400 दिंड्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे