पुणे (प्रतिनिधी)- भारतीय किनारपट्टीवर सर्वात जास्त वादळे ही बंगालच्या उपसागरात निर्माण होत असतात.अरबी समुद्रात निर्माण हाणाऱ्या वादळांचे प्रमाण कमी असते. त्यातून थेट मुंबईच्या आसपास त्याचा केंद्र बिंदू असणे हे दुर्मिळ आहे. गेल्या शंभर वर्षात पहिल्यादाच जून महिन्यात अशाप्रकारे वादळ निर्माण झाले आहे.
पावसाळ्याच्या काळात म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अनेक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असतात. त्यातील ठराविक कमी दाब प्रणालीचे रूपांतर वादळात होत असते. बहुतांशी वादळे बंगालच्या उपसागरात निर्माण होतात. त्यांचा प्रभाव सुद्धा जास्त असतो. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले तरी त्याचे वादळात रूपांतर होण्याचे प्रमाण कमी असते.
वादळ निर्माण झाले तरी ते अनेक वेळा येमेनच्या दिशेने सरकते. यावेळी निसर्ग हे वादळ थेट कोकण किनारपट्टीला धडकणार आहे. रायगड ते दमण या किनारपट्टीच्या भागात हे वादळ धडकणार आहे. विशेष म्हणजे ज्या किनारपट्टीच्या दरम्यानच्या भागात हे वादळ धडकणार आहे त्या भागात लोकसंख्येची घनता सुद्धा अधिक आहे. त्यामुळे जास्त खबरदारी घ्यावी लागणार आहे.