मुंबई – देशातील आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येत आहेत. त्यामुळे सलग पाचव्या दिवशी शेअरबाजार निर्देशांकांत भरीव वाढ झाली.
बुधवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 304 अंकांनी म्हणजे 0.77 टक्क्यांनी वाढून 39,878 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 76 अंकांनी वाढून 11,738 अंकांवर बंद झाला. गेल्या पाच सत्रात सेन्सेक्स 1,905 अंकांनी तर निफ्टी 516 अंकांनी वाढला आहे.
टायटनचा शेअर 4 टक्क्यांनी वाढला. बजाज ऑटो, मारुती, ओएनजीसी, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले. रिलायन्सचा शेअर 2.13 टक्क्यांनी वाढला.
एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख एस. रंगनाथन म्हणाले की, सकाळी निर्देशांकांत घट झाली होती. मात्र, पतधोरण समितीची बैठक सुरू झाल्यानंतर निर्देशांकांत वाढ झाली. पतधोरण समिती 9 ऑक्टोबरला पतधोरण जाहीर करणार आहे.