मुंबई- दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री सना खानने चित्रपटसृष्टीला रामराम केला. हा निर्णय घेतल्यानंतर तिने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला आणि त्यावेळी काही धार्मिक गोष्टीही शेअर केल्या. आपण आता या क्षेत्रापासून दूर जात असल्याचे तिने स्पष्ट केले. मश धिर्मासाठी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडणारी ती एकटी नाही. यापूर्वी अनेक जणांनी असा निर्णय घेतला आहे. त्यातले काही जण कालांतराने पुन्हा या क्षेत्रात परतले. तर काही बाहेरच पडले.
जायरा वसीम:
गेल्याच वर्षात जायरा वसीमनेही असाच निर्णय जाहीर केला होता. सिक्रेट सुपरस्टार आणि त्या अगोदर दंगल या दोन हिट चित्रपटांतून जायरा झळकली होती व तिने आपला एक चाहतावर्गही तयार केला होता. वयाच्या केवळ 19 व्या वर्षी यश आणि संपत्ती मिळाल्यानंतर जायराने हा निर्णय घेतला.
अनु आगरवाल:
आशिकी या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनु आगरवालने सुरूवातीलाच स्टारडम प्राप्त केले. त्यानंतर अनेक मोठे बॅनर आणि नायकांसोबत तिने काम केले. मात्र एका दुर्दैवी घटनेची ती शिकार ठरली. अनु एका अपघातत गंभीर जखमी झाली. त्यावेळी ती तब्बल 29 दिवस कोमात होती. तेव्हा ती मायानगरीच्या झगमगाटापासून दूर गेली ती कायमचीच. नंतर बरी झाल्यावर तिने आपली जिवनशैली बदलून टाकली. एक अध्यात्मिक स्वरूपाचे आयुष्य ती सध्या जगते.
तनुश्री दत्ता:
बोल्ड अभिनेत्री अशी इमेज असणारी तनुश्री दत्ता मध्यंतरी चित्रपटसृष्टीतून बाहेर गेली. अध्यात्मात रमल्यानंतर आता काही काळानंतर ती परत आली आहे. ती अद्याप कोणत्या चित्रपटात झळकली नसली तरी मध्यंतरी तिने मी टू अंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे ती प्रसिध्दीच्या झोतात आली. नैराश्यात गेल्यानंतरच चित्रपट सृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय तिने घेतला होता.
सुचित्रा सेन:
तब्बल 25 वर्षे आपली चित्रपटसृष्टीतील कारकीर्दी गाजवल्यानंतर अभिनेत्री सुचित्रा सेन अचानक रामराम ठोकला. रामकृष्ण मिशनमध्ये त्या सहभागी झाल्या व नंतर त्यांनी हेच आयुष्य स्वीकारले. त्या पुन्हा मायानगरीकडे परतल्या नाहीत. बंगाली आणि हिंदी चित्रपटांत त्यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या.
ममता कुलकर्णी:
धाडसी अभिनेत्रींच्या यादीत ममता कुलकर्णीचे नाव अग्रस्थानी होते. चित्रपटात बोल्ड दृश्ये देण्यापासून मासिकाच्या मुखपृष्ठावर उत्तेजक छायाचित्र प्रकाशित करण्यापर्यंत ममता सगळीकडे आघाडीवर होती. संजय कपूर, अतुल अग्निहोत्रीपासून अक्षय कुमार, शाहरूख- सलमानपर्यंत अनेक बड्या नायकांसोबत तिने काम केले. नंतर अचानक ती अध्यात्मात रमली. मध्यंतरी संन्याशिणीच्या वेषभुषेतील तिचे छायाचित्रे प्रसिध्द झाली होती. त्याचबरोबर तिचा कथित पती आणि तिच्या संदर्भात काही गुढ बातम्याही येत असतात.
बरखा मदान:
बरखा चित्रपटांत फार लक्षवेधी ठरली नाही. मात्र 1994 मध्ये मिस इंडिया कॉन्टेस्टच्या अखेरच्या राउंडपर्यंत ती पोहोचली. त्यानंतर मॉडेलींग आणि काही हिंदी तर काही पंजाबी चित्रपटांत तिने काम केले. अक्षय कुमारच्या खिलाडीयों का खिलाडी चित्रपटातही तिची वर्णी लागली होती. रामगोपाल वर्माच्या भूत चित्रपटातही ती झळकली होती. बौध्द धर्मापासून प्रेरीत होत अखेर तिने बॉलिवूडला रामराम केला. आता ती एका सन्याशाचे जिवन व्यतीत करत आहे.
विनोद खन्ना:
चित्रपटांना रामराम करत वेगळीच वाट चोखाळणारे सगळ्यांत मोठे आणि धक्कादायक नाव म्हणजे अभिनेता विनोद खन्ना. सुपरस्टार पद अगदी आवाक्यात आले असताना या अनेक चित्रपटांच्या यशस्वी नायकाने अचानक चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला. आपल्या कुटुंबीयांसमवेत जाहीर पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्या निर्णयाची घोषणा केली होती.
विनोद खन्ना ओशो रजनीश यांच्यापासून प्रभावित झाले होते. 1982 मध्ये कारकीर्दीच्या सर्वोच्च स्थानावर असताना त्यांनी अध्यात्माची वाट धरली. अर्थात कालांतराने त्यांचे पुनरागमनही झाले व त्यांची दुसरी इनिंगही यशस्वी ठरली. मात्र दरम्यानची पाचे वर्षे ते अभिनयापासून आणि मायानगरीपासून दूरच राहीले. पुनरागमन झाल्यावर त्यांनी अखेरपर्यंत चित्रपटांत काम केले. नायक आणि खलनायक अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी प्रचंड ताकदीने साकारल्या.