गर्भ पोटात असल्यापासून त्याचे पोषण आईमार्फत सुरू झालेले असते. हे पोषण चांगले होणे तर महत्त्वाचे असतेच पण त्याचबरोबर मूल जन्मल्यानंतर पहिले किमान दोन वर्षे त्याचे पोषण योग्य पद्धतीने होणे आवश्यक असते. हे पोषण योग्य पद्धतीने झाले तर त्याचे पुढील आयुष्य अधिक आरोग्यदायी राहू शकते असे अनेक संशोधनांतून समोर आले आहे.
लहान बाळाच्या जन्मापासूनच्या खाण्या-पिण्याच्या वेळा, त्याच्या अन्नातील सकसता आणि त्याच्या आजूबाजूचे वातावरण याचा त्याच्या मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक वाढीवर परिणाम होत असतो. अशावेळी त्याला योग्य तो पोषक आहार दिल्यास त्याची सर्वांगीण वाढ होण्यास निश्चतच मदत होऊ शकते. पाहूया आहार आणि बाळाची वाढ यांचा एकमेकांशी कसा संबंध असतो…
बालकाला जन्मल्यापासून आईचे दूध योग्य प्रमाणत मिळणे आवश्यक असते. सध्या विविध कारणांमुळे स्तनपानाचे प्रमाण कमी झाल्याने आईचे दूध योग्य प्रमाणात मिळत नाही. त्याचा बाळाच्या आरोग्यावर कायमचा परिणाम होतो.
सहा महिन्यांनंतर बाळाला भाज्यांचे सूप, खीर, मऊ भात, उकडून बारीक केलेली फळे अशाप्रकारचा पोषक आहार देण्यास हरकत नसते. या आहारातून बाळाच्या वाढीसाठी आवश्यक ती जीवनसत्त्वे व खनिजे मिळण्यास मदत होते.
सुरुवातीला भाताचं व वरणाचं पाणी दिवसातून 2-3 वेळा, 3-4 चमचे द्यावं. मुगाच्या डाळीची खिचडी, सूप, रवा, खीर, भाज्या, कोबी, फ्लॉवर, बटाटा इ. भाज्या खिचडीमध्ये शिजवून द्याव्यात.
सध्या बाजारात लहान बाळांसाठी विविध उत्पादने उपलब्ध असतात. घाईच्या वेळी अशा पदार्थांचा सर्रास वापर होताना दिसतो.
मात्र, या पदार्थांतून म्हणावे तसे पोषण मिळतेच असे नाही, तसेच यामध्ये अन्न टिकविण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक पदार्थ असण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा विकतच्या पदार्थांपेक्षा घरच्या घरी बनवलेला आहार बाळाच्या आरोग्यासाठी केव्हाही उत्तम ठरतो.
या दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत मुलाला योग्य पद्धतीचे पोषण मिळाले नाही तर त्याच्या वाढीवर तर परिणाम होतोच पण त्याचा विकास होण्यातही अडचणी येतात. तसेच या मुलांचे योग्य पोषण न झाल्याने त्यांची प्रतिकारशक्तीही सामान्यांपेक्षा कमी असते. त्यामुळे त्यांना कोणत्याही संसर्गाचा धोका अधिक असतो.
यासाठी योग्य ती जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉक्टर, कुटुंबातील सदस्य, शासकीय आरोग्य यंत्रणा यांनी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
दात यायला लागल्यावर बारीक केलेले पदार्थ देण्यास हरकत नाही. एक वर्षानंतर तर मूल बरेचसे पदार्थ खाऊ शकते. त्यामुळे तूप घातलेली पोळी, इडली, धिरडे, कमी तिखट अशा शिजलेल्या भाज्या, उसळी देण्यास हरकत नाही.
घरात बाहेरचे पदार्थ, फास्टफूड खाण्याच्या सवयी न ठेवल्यास मुलालाही त्या सवयी लागत नाहीत आणि घरी केलेला चौरस आहार घेतल्याने त्याचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. यासाठी घरच्या घरी वेगवेगळे पदार्थ तयार करून देता येऊ शकतात.