नगर – विनापरवाना खाद्यपदार्थ आणि किराणा मालाची विक्री करणाऱ्या पोखरी (ता. पारनेर) गावातील 15 दुकानदारांवर अन्न व औषध प्रशासनाने आज दंडात्मक कारवाई केली. या कारवाईने विनापरवाना खाद्यविक्री करणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या दुकानदारांकडून सुमारे 34 हजार 500 रुपयांचा दंड गोळा करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या नगर कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी कालिदास शिंदे यांना पारनेर तालुक्यातील पोखरी गावात अन्न सुरक्षा व मानके कायद्यातंर्गत आवश्यक असलेल्या परवाना न घेता खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी शिंदे यांनी सहायक आयुक्त एस. पी. शिंदे (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली पोखरी गावात जावून तपासणी केली. मिळालेल्या माहिती तथ्य असल्याचे आढळले.
त्यानुसार संबंधित खाद्यपदार्थ विक्री करणारे हॉटेल आणि किराणा दुकानदारांवर कारवाईच्या सूचना केल्या. पोखरी गावातील 16 दुकानांची तपासणी केली. त्यात 15 दुकानदारांकडे परवाना नसल्याचे आढळले. यात सर्वाधिक हॉटेल आणि दुकानदार होते. अन्न सुरक्षा अधिकारी शिंदे यांनी या 15 दुकानदारांना दंडाकात्मक कारवाईच्या नोटिसा बजाविल्या. त्यांच्याकडून अन्न व औषध प्रशासनाने सुनावणी घेत सुमारे 34 हजार 500 रुपयांचा दंड गोळा केल्याची माहिती सहायक आयुक्त एस. पी. शिंदे यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाच्या नगर कार्यालयाने अलीकडच्या काळात विनापरवाना दुकानदारांवर अशी एकाचवेळी केलेली सर्वात मोठी कारवाई आहे.