नगर – जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडून दहा दिवसही होत नाही तोच मानापमान नाट्यास सुरवात झाली आहे. संगमनेर येथील कृषी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रम पत्रिकेत नाव न टाकल्याबद्दल माजी अध्यक्षा शालिनी विखे व साईज्योती यात्रेच्या पत्रिकेत सुरवातीला नावे न टाकल्याने चारही विषय समित्यांचे सभापती नाराजी दिसून आले.
त्यामुळे आगामी काळात अध्यक्षा राजश्री घुले यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. साई ज्योती बचत गटाच्या कार्यक्रमांना विषय समित्यांच्या सभापतींना विश्वासात न घेतल्याचा आरोप होवू लागला आहे. त्यातून या कार्यक्रमांकडे सर्वच सभापतींनी पाठ दाखविली. त्यातच या कार्यक्रमास जिल्ह्यातील कुणी मंत्रीगणही आले नाही.
जे साईज्योती बचत गट प्रदर्शन उदघानाच्यावेळी झाले तेच कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमातही घडण्याची चर्चा आहे. तत्कालीन अध्यक्षा शालिनीताई विखे यांचेच पत्रिकेत नाव नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज आहेत. त्यातच हा कार्यक्रम संगमनेरला का ठेवण्यात आला आहे असाही सवाल उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे प्रगतशील शेतकरी व आदर्श गोपालक पुरस्कार जाहीर झाले असून,87 शेतकरी व 87 गोपालक अशा 174 जणांना शनिवारी,दि.11 गौरविण्यात येणार आहे. संगमनेर येथील माल0पाणी लॉन्स येथे हा गौरव सोहळा होणार असल्याची माहिती जिल्ह परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय पटागंरे यांनी दिली.
जिल्ह्यातील 14 तालुक्यामध्ये एकूण 87 प्रगतशील शेतकरी व 87 आदर्श गोपालकांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. शेती व दुग्धव्यवसायात चांगले काम करणाऱ्या शेतकरी व गोपालकांना सपत्नीक गौरविण्यात येणार आहे. सन्मानपत्र व गौरवचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पशुधन अधिकारी,कृषी अधिकाऱ्यांचाही गौरव
पशुवैद्यकीय दवाखान्यात व कार्यालयात उत्कृष्ट काम करणारे 14 पशुधन विकास अधिकारी तसेच 14 सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,पशुधन पर्यवेक्षक यांना व 3 व्रणोपचारक असे पुरस्कार वाटप करण्यात येणार आहे. तसेच कृषी विभगाच्यावतीने एक कृषी अधिकारी,दोन विस्तारअधिकारी,9 कार्यालयीन कर्मचारी यांनाही पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.