मुंबई – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काल (दि. २५) शिवसेनेचा दसरा मेळावा मर्यादित नेतेमंडळी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री ठाकरे व राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका सुरु आहे.
अशात काल उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या कालच्या भाषणामध्ये चौफेर टोलेबाजी केली. शिवसेना व राज्य सरकारच्या टीकाकारांनाही त्यांनी चांगलेच सुनावले आहे. तसेच बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिचा देखील ठाकरे यांनी समाचार घेतला.
गेल्या महिन्याभरापासून चालू असलेल्या सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर मुंबई आणि महाराष्ट्रातील राजकारणात नव्या वादानं डोकं वर काढलं होतं. या प्रकरणात अभिनेत्री कंगना राणावत हिने थेट राज्याचे पर्यटन मंत्री आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंचंही नाव घेत आरोप केले होते. त्याचबरोबर मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली होती. कंगनाकडून करण्यात आलेल्या आरोपांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नामोल्लेख टाळत प्रत्युत्तर दिलं.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, “रामानं रावणाचा वध केला. आपणही प्रातिनिधीक स्वरूपात रावणाचा वध करतो. हा रावण दहा तोंडांनी महाराष्ट्रावर आलेला आहे. रावणाचं एक तोंड म्हणतंय, मुंबई पाकव्याप्त काश्मीर झालेला आहे. महाराष्ट्र मुंबई पोलीस निकम्मे आहेत. ते काही काम करत नाहीयेत. इकडे सगळे नशिले आहेत. ही कसली रावणी औलाद.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, काश्मीर मध्ये अधिकृत १ इंच जमीन तरी तुम्ही आज घेऊन दाखवा आणि मग आमच्या अंगावर या. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं. वरती दाखवायचं की आम्ही कष्ट केलेले आहेत. मुंबई महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची अश्या शब्दात उद्धव ठाकरे यांनी कानांचा समाचार घेतला.