जिल्हा न्यायधीश ब्रह्मे यांचे राजगुरूनगरात आवाहन
राजगुरूनगर- रस्त्यावर प्रवास करताना आपण स्वत: सुरक्षित राहून समोरच्यालाही सुरक्षित ठेवायचे असेल तर सर्वांनीच वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांनी केले.
राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात तालुका विधी सेवा समिती, खेड बार असोसिएशन आणि खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कायदेविषयक शिबिरात बोलत होते. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश ए. एम. अंबाळकर, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर के. एच. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी. बी. पतंगे, संस्थाध्यक्ष ऍड. देवेंद्र बुट्टेपाटील, खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. एस. व्ही. कड, प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, सहपरिवहन अधिकारी प्रियंका दडस, चाकण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक डी. एम. कोंडे देशमुख, संचालक बाळासाहेब सांडभोर, ऍड. माणिक पाटोळे, ऍड, आरती टाकळकर, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य एस. एन. टाकळकर उपस्थित होते.
या शिबिरात ऍड. साधना बाजारे यांनी “नागरिकांची कर्तव्ये’ या विषयावर बोलताना विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, सार्वजनिक स्वच्छता, देशहिताला प्राधान्य, राज्यघटनेचे पालन, स्त्रियांचा सन्मान करण्याचे आवाहन केले. प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी वाहतुकीचे नियम या विषयावर मार्गदर्शन करताना चालकांचे वेगावरील नियंत्रण, सिट बेल्ट बांधणे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे टाळावे, सिग्नल न तोडणे आदि नियमांचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
सह दिवाणी न्यायाधीश डी. बी. पतंगे यांनी वाहन चालकाची वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियम पाळण्यात खरी हिरोगिरी असल्याचे सांगितले. जिल्हा न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांनी वाद निवारण करण्यासाठी मध्यस्थी, लोकअदालत अथवा लवादाच्या माध्यमातून प्रयत्न करताना संवाद व सहमतीवर भर देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात ऍड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी, सूत्रसंचालन ऍड. शुभम गाडघे यांनी, स्वागत ऍड. डॉ. संजय शिंदे यांनी तर ऍड. सागर मैड यांनी आभार मानले.