अकोले (प्रतिनिधी) – प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे जनतेने तंतोतंत पालन करावे. आपली स्वतःची काळजी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन संगमनेरचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी केले आहे.
डॉ. मंगरुळे म्हणाले, करोना विषाणू संसर्गाचा धोका अजून संपलेला नाही. नागरिकांनी अनावश्यक बाजारपेठेत फिरू नये. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर जायचे असल्यास जाताना सामाजिक अंतराचे कसोशीने पालन करावे. बाहेर पडताना तोंडावर मास्क लावावा. अनावश्यक बाजारपेठेत फिरू नये. वृद्ध व्यक्ती, मधुमेह, उच्चरक्तदाब, गर्भवती महिला, बालकांनी बाजारपेठेत जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
अलीकडे काहीशी बंधने हटविल्यानंतर बाजारपेठ गजबजलेल्या अवस्थेत निदर्शनास आले आहे. सामान्य नागरिकांनी बाजारपेठेत एकाच वेळी गर्दी केली आहे. अनेक जण बाजारपेठेत येताना सामाजिक अंतराचे पालन करीत नाहीत.अनेक नागरिक मास्क न लावता बाजारपेठेतफिरत होते. दुचाकीवर एकाच व्यक्तीने प्रवास करणे अपेक्षित असताना दोन, तीन जण प्रवास करत आहेत. दुकानदार देखील सामाजिक अंतराचे पालन करीत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे यापुढे सूचनांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनीदिला आहे.