अकोले: अकोले तालुक्यात आदिवासी व इतर पट्ट्यात चारा टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी शासकीय नियमात सुधारणा करण्याची मागणी जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी केली आहे.
लहामटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे यांना चारा पुरवठ्यासंदर्भात निवेदन दिले. अकोले तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. डांगण भागात डांगी जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत. या जनावरांचे जतन होणे गरजेचे आहे. गावठी गायींचे कळपच्या कळप आदिवासी भागात आढळत आहेत. या वर्षी दुष्काळाच्या शेवटच्या टप्प्यात चारा टंचाई निर्माण झाली आहे. डोंगर-दऱ्यांत वास्तव्य करणारे सातेवाडी परिसरातील गुराख्यांनी जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांची भेट घेऊन चारा पुरवठ्याची मागणी केली.
दुष्काळाचे भयाण वास्तव या वर्षी पहायला मिळत आहे. डोंगर उघडे पडले, रान, जंगले पेटवली जाऊ लागली. यामुळे भयाण परिस्थिती निर्माण झाली. पावसाळा लांबला अथवा सुरू जरी झाला, तरी ही जनावरे जगवणे मुश्कील होणार आहे. कारण पाऊस सुरू झाला तरी लगेच चारा उपलब्ध होणार नाही. शासकीय नियमांत बदल करून आदिवासी भागातील जनावरांसाठी दावणीला चारा देण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे डॉ. लहामटे यावेळी म्हणाले.
तहसीलदार कांबळे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे मान्य केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, रमेश राक्षे, भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेळके, पोपट चौधरी, ग्रामस्थ उपस्थित होते.