पाटणा- माझ्यावर व्यक्तिगत टीका करून वेळ घालवण्यापेक्षा सत्ताधारी असलेल्या भाजप व जेडीयूच्या नेत्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था, बेकारी अशा विषयात लक्ष घालून काम करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केली आहे. आम्हाला त्यांच्या या बडबडीचा गेल्या 30 वर्षांचा अनुभव आहे. बिहार सरकारने करोनाग्रस्तांची आकडेवारी जाहीर करणे बंद केले आहे. राज्यातील क्वारंटाइन केंद्रे बंद करण्यात आली आहेत, हा सगळा काय तमाशा आहे त्याची त्यांनी आधी उत्तर दिले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
तेजस्वी यादव हे अल्पवयीन असताना त्यांचे वडील लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या नावावर जमीन खरेदी करून ठेवली असल्याचे एक जुने प्रकरण राज्यातील एक मंत्री नीरजकुमार यांनी पुढे करून तेजस्वी यांच्यावर नुकतीच टीका केली होती. तो धागा पकडून त्यांनी ही टीका केली आहे. ही मंडळी गेली 15 वर्षे सत्तेवर आहेत. पण अजूनही त्यांनी आमच्या कुटुंबांच्याच नावाने ओरड करून आपली राजकीय दुकानदारी चालवली आहे, असे ते म्हणाले. तथापि, गेल्या 15 वर्षात या मंडळींनी केलेल्या भ्रष्टाचार आणि गैरकारभाराची सारी प्रकरणे राज्यातील जनतेच्या लक्षात आली आहेत, असे ते म्हणाले. बिहारमधील शिक्षण, आरोग्य आणि अन्य कारभाराचा साफ बोजवारा उडाला आहे. त्याच्या सुधारणेकडे या लोकांनी लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले.