नवी दिल्ली – आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा तोंडावर असताना विनाकारण नेतृत्वाच्या बाष्कळ चर्चा करण्यात वेळ घालवू नका, तर कामगिरीकडे लक्ष द्या, असे सल्ला बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव खुक्ला यांनी भारतीय संघाला दिला आहे. तसेच या निमित्ताने त्यांनी ही चर्चा करत असलेल्या काही माजी क्रिकेटपटू व समीक्षकांनाही त्यांनी टोला लगावला आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहली कर्णधारपद सोडेल आणि रोहित शर्माकडे मर्यादित षटकांच्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी माहिती काही माध्यमांनी दिली. कोहलीला आपल्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करायचे असल्याने असा निर्णय होणार असल्याचाही दावा करण्यात आला होता. मात्र, कोहली हाच भारतीय संघाचा तीनही प्रकारातील संघांचा कर्णधार असेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले.
संघाच्या विभाजीत नेतृत्वावर सध्या सुरू असलेल्या चर्चा म्हणजे केवळ फालतू गप्पा आहेत. या गप्पा बंद करून सगळ्यांनी टी-20 विश्वकरंडकावर लक्ष द्यायला हवे. विनाकारण भविष्याच्या योजनांविषयी अफवा पसरवण्यात काही अर्थ नाही. कर्णधारपदाविषयी अशी कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती राजीव शुक्ला यांनी दिली. स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे.
आधी ही स्पर्धा भारतात होणार होती. पण भारतातील करोनाचा प्रसार आणि व्याप्ती पाहता ही स्पर्धा अमिराती आणि ओमान येथे होणार आहे. या स्पर्धेत आधी पात्रता फेरी रंगणार आहे. त्यानंतर मूळ स्पर्धेला सुरुवात होईल. भारताचा सलामीचा सामना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.