शिवाजीनगर ते जंगली महाराज रस्त्याकडे जाणारा मार्ग
संचेतीजवळ तिन्ही प्रहर वाहतूक कोंडी कायम
– तुषार रंधवे
पुणे – वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रासलेल्या पुण्यात वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ (सीओईपी) उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. मात्र, नव्या उड्डाणपुलावरुन वाहतूक सुरू झाल्यानंतरही येथे वाहतूक कोंडीची समस्या सुटलेली नाही. संचेती रुग्णालयासमोर “बॉटल नेक’ समस्येने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
जुना पुणे-मुंबई महामार्ग, नाशिक महामार्ग, तर पुणे स्टेशनच्या बाजूने शहरात दाखल होण्यासाठी नाबार्ड कार्यालयाजवळ एकमेव उड्डाणपूल होता. मात्र, येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ नव्याने उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. पुण्यात येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी उभारलेल्या या नव्या उड्डाणपुलामुळे वाकडेवाडीच्या दिशेने होणारी वाहतूक ही चालकांसाठी सुकर झाली आहे. मात्र, संगमवाडी, वाकडेवाडी तसेच संगम पुलाकडे जाणाऱ्या या तीनही बाजूंनी येणारी वाहने संचेती रुग्णालयाजवळ आल्यानंतर प्रचंड वाहतूक कोंडी होते.
गणेशोत्सवात पुणेकरांसह बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना कोंडीत दोन-दोन तास अडकण्याचा अनुभव येतो. शिवाजीनगर न्यायालयाकडे जाण्यासाठी येथे रस्ता आहे. याशिवाय पुणे विद्यापीठाकडून येणाऱ्या वाहनांसाठी “ग्रेडसेपरेटर’ आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून येणाऱ्या वाहनांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, शिवाजीनगरहून संगमवाडीकडे जाणाऱ्या वाहनांची रांग पाहून या वाहनचालकांना पुणे स्टेशनमार्गे शहराबाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
दिवाळीच्या काळात संगमवाडी पुलाजवळ खासगी ट्रॅव्हल्समुळे तास-तासभर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे संगमवाडीकडे जाणारी वाहतूक ग्रेडसेपरेटरमधून पुणे स्टेशनला वळवण्याची वेळ पोलिसांवर येते. निदान त्यामुळे कोंडी कमी होण्यास हातभार लागतो. याशिवाय आता मेट्रोसाठी शिवाजीनगर बस स्थानकाचे शासकीय दूध डेअरीजवळ स्थलांतर केल्याने येथे वाहतूक कोंडी काही अंशी का होईना, कमी होण्यास हातभार लागणार आहे.
पर्यायी मार्गांचा आराखडाच नाही
पुणे शहरातील काही रस्ते हे वर्षातील ठराविक महिने वाहतुकीसाठी बंद असतात.
उदा. दरवर्षी पावसाळ्यात नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद होतात. येथून जाणारी सर्वच वाहने वरच्या रस्त्यांवर येतात अन् संख्या वाढल्याने वाहतुकीची कोंडी होते. अशा परिस्थितीत वाहने वाढली, तर पर्यायी मार्गांचा आराखडाच वाहतूक पोलिकांकडे नसल्याने सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या प्रकल्पांसाठी रस्ते बंद ठेवले जातात. अशावेळी त्या रस्त्यांवरचे वाहतूक नियोजन कोलमडलेले दिसते अन् मनस्ताप सहन करत वाहनचालक वाहने चालवत असतात. त्याकरिता पर्यायी आराखडे तयार करणे गरजेचे आहे.