पुणे- मार्केट यार्डातील मुख्य बाजारातील भुसार, फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग सुरू आहे. मात्र, फुलाचा बाजार अद्याप बंद आहे. आडते आणि शेतकऱ्यांकडून बाजार सुरू करण्याची मागणी होत आहे. 15 जूननंतर बाजार सुरू करणाचा विचार कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.
सध्या लॉकडाऊनमुळे मंदिर बंद आहेत. लग्नकार्यही फारशी होत नाहीत. सोशल डिस्टनिंगचे पालन करण्याच्या अडचणीचा विचार करून अद्याप बाजार बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, फुल बाजार आडते असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क करून बाजार सुरू करण्याबाबत विचारणा केली असून, शेतकऱ्यांकडून याबाबात मागणी होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून 15 जूननंतर आडते, शेतकऱ्यांशी संवाद साधून बाजार सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, मुख्य बाजार आवाराबरोबरच मोशी, मांजरी आणि उत्तमनगर येथील उपबाजार सुरू आहेत. करोन संसर्गाचा प्रादुर्भाव, काही दिवस बाजार बंद असणे, चक्रीवादळ हवामानात झालेला बदलामुळे सर्वच बाजारातील शेतीमालाची आवक कमी झाली आहे. काही दिवसातच परिस्थिती बदलल्यानंतर आवक पूर्वपदावर येईल. बाजार समितीकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण काळजी घेतली जात आहे.
बाजारात कामावर हजर होण्यापूर्वीच 150 कर्मचाऱ्यांची करोनाची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये नऊ जणांना करोना असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी सात जण बाजार समितीचे, तर दोन जण ठेकेदारांचे कर्मचारी आहे. त्यांच्यवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्यात करोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नसून, ते लवकरच बरे होतील. सोशल डिस्टनिंग पाळणे, थर्मलने तापमान तपासणे, सॅनिटायझर वापरणे आणि मास्क घातल्याशिवाय बाजारात प्रवेश नाही, या आणि अशी उपाययोजना बाजार समितीकडून करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.