पुणे – राज्याच्या अनेक भागांना महापुराचा तडाखा बसला आहे. या पार्श्वभूमीवर नद्या-समुद्रकिनारी असणाऱ्या गावांच्या सुरक्षेसाठी संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहेत. केरळमध्ये यापूर्वी असा निर्णय घेण्यात आला. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात असा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण, पर्यावरण-जलतज्ज्ञांचे या विषयावर मते-मतांतरे आहेत. याबाबत “प्रभात’ने ही मते जाणून घेतली.
महापुरातून जी हानी होते, ती टाळण्यासाठी “नदीकाठी संरक्षक भिंत बांधणे’ हा सामान्य पर्याय आहे. “संरक्षक भिंत बांधणे’ या विषयावरील तांत्रिकता समजून घेणे आवश्यक आहे. हा उपाय फार प्राचीन काळापासून अंमलात आणला जातो. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यावर होणारी हानी वाचवण्यासाठी काठावर भिंत बांधणे हा साहजिक उपाय होय, असे सांगितले जात आहे.
नदीकाठी अशी भिंत कुठेही मनाला वाटेल तिथे बांधली जात नाही. नदीकाठची वस्ती, सखल भाग, नदीपात्राचा उतार, विस्तार, पाण्याचा साठा, प्रवाह वेग, वळणं, बांध-अडथळे, नदीला येऊन मिळणाऱ्या ओढा- प्रवाहांच्या जागा अशा अनेक गोष्टींचा विचार करून ते ठरवलं जाणं अपेक्षित असतं. भिंत बांधणे हा एक तातडीचा उपाय म्हणून योग्यच ठरतो. फक्त ही भिंत सिमेंट, दगड किंवा नैसर्गिक आच्छादनाची असावी की अन्य पर्याय हे अभ्यासानुरुप ठरते. अल्प प्रमाणात सरळीकरण हा देखील पूर नियंत्रणाचा एक मार्ग आहे. खरं तर अशी भिंत बांधावयाची गरजच पडू नये. यासाठी पाणलोटातील जल व्यवस्थापन आणि एखाद्या नदीवर धरण बांधल्यावर त्या पाण्याचे वितरण-व्यवस्थापन या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. – उपेंद्र धोंडे, भूजल वैज्ञानिक, सहज जलबोधकार
पूर रोखण्यासाठी “भिंती बांधणे’ हा विचारच चुकीचा आहे. यापूर्वी बिहारमध्ये कोसी नदीवर असा प्रयत्न झाला होता. पण तो अपयशी ठरला. भिंतीमुळे पुराची तीव्रता कमी होण्याऐवजी ती आणखी वाढली. पुराची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला नदी, नाल्याच्या प्रवृत्ती लक्षात घेतले पाहिजे. तिचा प्रवाह वाहतो तेथील माती, दगड, जमिनीचे स्वरूप याचा अभ्यास केला पाहिजे. नदी, ओढे, नाले यांचा नैसर्गिक प्रवाह कायम राहील, त्यामध्ये अतिक्रमण होणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रवाहाच्या ठिकाणी इमारती, भिंती यांमधून पाण्याचा योग्य निचरा होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. संगमाच्या ठिकाणी “बफर’ झोन’ची निर्मिती व्हावी. संरक्षण भिंत बांधून काहीही उपयोग होत नाही, याउलट या अडथळ्यामुळे पाणी पुढे जाण्याऐवजी मागे सरकेल आणि इतर भागांमध्ये पसरेल. याची प्रचिती 2019 साली आंबिल ओढ्याला आलेल्या पुराच्यावेळी आपण घेतली आहे. – शैलजा देशपांडे, संस्थापक संचालक, “जीवितनदी’