दौंड तालुक्याच्या एका बाजूला पूर, तर दुसऱ्या बाजूला टॅंकर अशी स्थिती सध्या झाली आहे. तालुक्यातून भीमा नदी वाहते. गेल्या काही दिवसांपूर्वीच भीमा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर येऊन गेला, त्यामुळे अर्थातच भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण सध्या कमी झालेले असले तरी कमी-जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे, त्यामुळे थोडा जरी पाऊस वाढला तरी लगेच धरणातून पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडला जात आहे. ही एक बाजू तालुक्याच्या एका बाजूला आहे, मात्र असे असतानाच दुसऱ्या बाजूला तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावांमध्ये आजही टॅंकर सुरू आहे.
तालुक्यातील रोटी, वासुंदे, जिरेगाव, खोर, हिंगणीगाडा, कौठडी या गावांना सध्या नऊ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, त्यामुळे एकाच तालुक्यात दोन प्रकारची नैसर्गिक स्थिती सध्या दिसून येत आहे. या वरील गावात प्यायलाही पाणी उपलब्ध नसल्याने अधिक प्रमाणात टॅंकरने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. मात्र दुसऱ्या बाजूला भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांना व नदीकाठच्या रहिवाशांना सरकारकडून आपत्कालीन मदत मिळण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरी 172 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाचे हे प्रमाण जेमतेम असल्याचे समोर येत आहे. पावसाचे प्रमाण असे अत्यल्पच राहिले, तर मात्र दुष्काळी पट्ट्यातील गावांना याचा मोठा फटका बसू शकतो. सध्या धरणे पूर्ण क्षमतेने भरले असल्याने धरण क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या शेतीला त्याचा फायदा होणार असल्याने तेथील शेतकरी खुश झाला आहे. एकंदरीतच तालुक्यात एका बाजूने महापूर, दुसऱ्या बाजूने दुष्काळ अशी स्थिती असल्याने दुष्काळी भागात वेगवेगळ्या सिंचन योजनेद्वारे पाणी सोडून त्या योजनेद्वारे तळी भरून घेतल्यास आगामी काळात त्याचा उपयोग होऊ शकतो असे तेथील नागरिकांचे मत आहे. यावर तात्काळ तळी भरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे तसे जर झाले तर मात्र दुष्काळी वाटणाऱ्या भागालाही सुकाळ पाहायला मिळू शकतो.