हजारो नागरिक पुरात अडकले
नवी दिल्ली : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता व परिसराला बसलेल्या पुराच्या तडाख्यात आतापर्यंत किमान 60 लोक ठार झाले असून, देशातील हजारो नागरिक पाण्यात बुडालेले त्यांच्या घरी जाऊ शकलेले नाहीत.
सुमारे 3 कोटी लोकसंख्येच्या शहरी भागांमधील संपूर्ण परिसर पाण्यात बुडाल्यामुळे, या ठिकाणी उभारण्यात आलेल्या निवारागृहांमध्ये 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. नववर्षांच्या पूर्वसंध्येला सुरू झालेल्या मुसळधार पावसाने या भागात, तसेच जावा बेटांच्या दक्षिण टोकाला असलेल्या शेजारच्या लेबाक येथे जोरदार पूर आणि दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत.
या पूरस्थितीमुळे बळी गेलेल्यांची संख्या 60 वर पोहचली असून अद्याप एकजण बेपत्ता आहे, असे इंडोनेशियाच्या आपदा व्यवस्थापन यंत्रणेने शनिवारी सांगितले. आणखी मृतदेह आमच्या हाती लागले आहेत, असे राष्ट्रीय आपदा शमन यंत्रणेचे प्रवक्ते अगुस विबोवो म्हणाले. निवारागृहांमध्ये अन्न आणि पेयजलाची टंचाई निर्माण झाली असून, नवजात बालकांसह निर्वासित लोक पातळ चटयांवर विसावल्याचे दिसत होते.
काहीजणांना आंघोळीसाठी तसेच भांडी धुण्यासाठी पुराचे पाणीच वापरणे भाग पडले आहे. आम्हाला निवारागृहात स्वच्छ पाण्याची आवश्यकता आहे, असे जकार्ताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या एका निवारागृहातील व्यक्तीने सांगितले.