जकार्ता – इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथे पूराचे थैमान सुरू असून त्यातच देशाच्या पूर्व किनारपट्टीला आज भूकंपाचा जोरदार धक्का बसला आहे. या दुहेरी नैसर्गिक आपत्तींमध्ये देशभरात 5 जणांचा मृत्यू झाला आणि अन्य तिघेजण बेपत्ता आहेत. जकार्ता शहरामध्ये पूराचे पाणी घुसल्यामुळे शेकडो जणांना घरापासून दूर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जकार्तामधील राजप्रासादाच्या परिसरातही पूराचे पाणी साचले आहे. त्याशिवाय मोठी रुग्णालये आणि शहराच्या आजूबाजूचा सर्व परिसर मंगळवारी पाण्याखाली गेला होता. गेल्या काही आठवड्यात जकार्तातील पूरात आतापर्यंत 70 नागरिकांच्या मृत्यूची नोंद आहे. गेल्या आठवड्यात दोन युवक पूरामध्ये बुडाले असे इंडोनेशियाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने सांगितले. संयुक्त बचाव दल अद्याप अन्य तिघांचा शोध घेत आहे, असे एजन्सीचे प्रवक्ते अगस विबोवो यांनी सांगितले. सुमारे 20 हजार नागरिकांनी आपत्कालिन शिबीरांमध्ये आश्रय घेतला आहे.
जकार्तामध्ये अनेक ठिकाणी पूराच्या पाण्याची पातळी 1 मीटरपर्यंत आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी बचाव पथकाला बोटींचा वापर करावा लागतो आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी गेल्या वर्षी बोर्निओ बेटावरच्या नवीन शहरामध्ये राजधानी स्थलांतरीत करण्याच्या योजनेची घोषण केली आहे.