नीरा – नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी सकाळपासून नदी दुथडी भरून वाहत होती. आज, दिवसभर नीरा नदी वाहताना पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. वीर धरणातून नदीत 23,600 क्युसेक वेगाने तर सायंकाळी पाच वाजल्यापासून 32,324 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे नीरा येथील ब्रिटिशकालीन पुलाला पाणी लागले होते तर प्रसिद्ध दत्त मंदिराच्या सभागृहात दिवसभर पाणी शिरले होते.
भाटघर धरण परिसरात 15 मिलीमीटर, निरा देवधर धरण परिसरात 52 मिलीमीटर तर वीर परिसरात 0.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज, सकाळी भाटघर धरणात 73.04 टक्के, निरा देवधर धरणात 78.14 टक्के तर वीर धरणात 98.19 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वीर धरणातून पहाटे तीन वाजल्यापासून 23,600 क्युसेक वेगाने नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होता.