पुणे – पश्चिम महाराष्ट्राला बसलेल्या पुराच्या फटक्याचे परिणाम राज्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये व शैक्षणिक संस्थांच्या मुलाखती व प्रवेश प्रक्रियांवर झाला आहे. या सर्व कार्यालयांचे विस्कळीत वेळापत्रक पुन्हा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही मुलाखती व प्रवेश प्रक्रियांच्या सुधारित तारखा जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. यापैकी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात दहा-बारा दिवस जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. नागरिकांची घरे पाण्याखाली होती. त्यामुळे अनेक उमेदवार व विद्यार्थी हे रोजगार, शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया अथवा मुलाखतीपासून वंचित राहू नयेत, याकरिता विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या या प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने (बार्टी) आयोजित राज्यसेवा पूर्व चाळणी परीक्षा 10 ऑगस्टला होणार होती. त्यामध्ये दोनवेळा बदल करत ती येत्या 1 सप्टेंबरला होणार आहे. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टने पुण्यात आयोजित केलेले राज्यस्तरिय चर्चासत्र स्थगित केले आहे. आता ही संस्था या तीनही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ऊस पिकाबाबत शेतामध्ये जाऊन मार्गदर्शन करणार आहे.
कृषी पदव्युत्तर परीक्षेच्या तारखांमध्येदेखील बदल करण्यात आला होता. याशिवाय पशुसंवर्धन विभागाची 10 ऑगस्टला विविध संवर्गासाठी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. याशिवाय या विभागाच्या वतीने विविध योजनांसाठी निवडी केलेल्या लाभार्थिंना कागदपत्रे अपलोड करण्याची मुदत देण्यात आली होती.