पाबळ -पूरग्रस्तांना दोन घास देण्यासाठी जात असलेल्या पाबळच्या तरुणांच्या संकल्पाला येथील पद्ममणी जैन ट्रस्टने आगे बढोची साद देत तब्बल एकतीस हजारांचा किराणा दिला. उद्या बुधवारी ही टीम पूरग्रस्तांना ताजे अन्न देण्यासाठी रवाना होत आहे.
पाबळ येथील तरुणांनी सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना स्वतःच्या हाताने आठ दिवस, दोन घास गरम अन्न देण्याचा संकल्प केला असून, दररोज किमान तीनशे पूरग्रस्तांना दोन वेळ जेवण देण्यात येणार आहे. याठिकाणी आठ दिवस ही टीम काम करणार आहे. यावेळी जैन ट्रस्टचे सतीश गांधी, प्रकाश शहा, जयश शहा, हर्षद गांधी, राजेंद्र शहा, पत्रकार सुनील पिंगळे, बाबा इनामदार, शंकर नरहे, जनार्दन वारघडे, सोमनाथ सुतार, सनी लोहार उपस्थित होते.
दरम्यान मूळचे पाबळ येथील व सध्या नागपूर येथे कार्यरत असलेले पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या माध्यमातून व जिल्हाधिकारी कार्यालयाचे मार्गदर्शनातून कोल्हापूर येथील एका पूरग्रस्त गावात ही टीम जाणार आहे.