हिंगोली – मागील चार दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हाहा:कार माजवला आहे. शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच पुराच्या पाण्यात अनेकजण वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. लोकांना वाचवताना तरूणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. लखन गजभारे (रा. येलकी, ता. कळमनुरी) असे लोकांचा जीव वाचवताना पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.
कयाधू आणि पूर्णा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी लखन गजभारे या युवकाचा मृतदेह देखील ग्रामस्थांना उसाच्या शेतात आढळून आला आहे. काल पासून लखन येलकी गावच्या शिवारातील ओढ्यात तो वाहून गेला होता.
मागील तीन वर्षापासून लखन हा लोकांना संकटकाळी मदत करायचा. त्याने आजपर्यंत तब्बल पाचशे जणांना पुराच्या पाण्यातून वाचविले होते. मात्र, आज त्याला लोकांना वाचवताना आपला जीव गमावावा लागला आहे. गेल्या दोन दिवसापासून लखन हा ओढ्याला आलेल्या पुरामुळे शेतात अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र, काल सायंकाळी अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने ओढ्याच्या पाण्यात तो वाहून गेला. लखनच्या मृत्युने येलकी गावावर शोककळा पसरली आहे.