- शहरात उघडझाप, पश्चिम घाट माथ्यावरती पावसाचा जोर
- राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे अद्यापही उघडेच
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज सकाळपासून कोल्हापूर शहर परिसरात पावसाची उघडीप असली तरी पश्चिम घाट माथ्यावर ती पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील सर्वच धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अद्यापही मुसळधार पाऊस पडत असून राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे अद्यापही उघडेच आहेत. पंचगंगा धोक्याच्या पातळीवर म्हणजे 44 फूट 9 इंचा वरती वाहत आहे.
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीन रौद्र रूप धारण केल्यानंतर कोल्हापूर शहरात आता अनेक ठिकाणी पाणी फिरायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर शहराबरोबर आंबेवाडी आणि चिखली गावातील पूरग्रस्त भागातील लोकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केलेले आहे. दरम्यान एनडीआरएफच्या जवानांनी शिवाजी पूल परिसरात असणाऱ्या पंचगंगेच्या पुराबाबत माहिती घेऊन करवीर तालुक्यातील चिखली आंबेवाडी या गावातील पूर परिस्थितीची पाहणी केली.
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर शहरानजीक असणाऱ्या शिरोली गावाच्या परिसरात असणाऱ्या सर्व्हिस रोडवर जवळपास दहा फुटांपेक्षा अधिक पाणी आल्यामुळे सर्विस रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.