मुंबई – नागपूर विभागामध्ये गेल्या 24 तासात पडलेल्या पावसामुळे भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पूरग्रस्त भागात स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत मदत कार्य सुरु आहे. 1531 नागरिकांना गेल्या 24 तासात सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. राज्यात इतरत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे. राज्यात कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या विभागात कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असून कुठेही गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही.
नागपूर विभागामध्ये भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिनांक 14 ते 15 ऑगस्ट 2022 या 24 तासाच्या कालावधी मध्ये गोंदिया जिल्हा तसेच मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात सरासरी 173.5 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. तसेच वैनगंगा नदीची उपनदी असलेल्या बाघ नदीवरील शिरपूर व पुजारीटोला या धरणातून चालू असणाऱ्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली.
यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सद्यस्थितीत पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात बाघ व बावनथडी या नद्या धोका पातळीच्या वर वाहत असून पूरग्रस्त भागातील 200 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. या पूरस्थितीचा परिणाम भंडारा जिल्ह्यावर झाल्याने भंडारा जिल्ह्यातही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. वैनगंगा नदी धोका पातळीच्या वर वाहत आहे. पूरग्रस्त भागातील 900 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एसडीआरएफचे एक पथक मदत कार्यात सक्रिय आहे.
तसेच गोसीखुर्द प्रकल्पाचा विसर्ग व छत्तीसगड राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रवती नदीच्या पाणी पातळीत झालेली वाढ याचा एकत्रित परिणामामुळे गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे. प्राणहिता नदी धोका पातळीच्या वर वाहत असून पूरग्रस्त भागातील 431 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.