कोल्हापूर – आमच्या सत्ता कालावधीत नुकसानीच्या तिप्पट पैसे दिले होते. आता मात्र राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळाली नाही, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. दरम्यान, पुराचं पाणी दुष्काळी भागात नेण्याचा विचार व्हावा. तसेच मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना तत्काळ मदत घोषित करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी, कोल्हापूर दौऱ्यावर होते. पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर कोल्हापुरात त्यांची पत्रकार परिषद झाली.
फडणवीस म्हणाले, आमच्या सरकारच्या कालावधीत पूरग्रस्त भागातील कर्ज माफ केले होते. पूरग्रस्तांना तत्काळ मदत केली होती, असे निर्णय जलदगतीने घ्यायचे असतात. यंदा मात्र तातडीची मदत अजून पोहोचली नाही.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. शेती, दुकाने, शाळांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ मदत घोषित करावी. व्यापाऱ्यांना सवलतीचे कर्ज दिले पाहिजे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात, मूर्तीकारांना विशेष मदत दिली पाहिजे. पूरग्रस्त भागातील लाइट मीटर खराब झाले असून त्यांता मोफत मीटर बसवून द्यायला हवेत.
पूरनियंत्रणात राहण्यासाठी भाजप सरकारच्या कालावधीत 22 छोट्या मोठ्या पुलांचा आराखडा तयार केला होता. त्या आराखडयाची अंमलबजावणी करावी. कोल्हापूरला पुराच्या विळख्यातून सोडवायला हवे. पुराचे, महापुराचे पाणी दुष्काळी भागात नेण्याचा विचार झाला पाहिजे.
ही वेळ मूल्यमापनाची नव्हे
पूरस्थितीच्या कालावधीतील ठाकरे सरकारच्या कामाचे मूल्यमापन आता करणार नाही. सध्याची वेळ ही मूल्यमापनाची नाही. अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना आवश्यक आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.