औरंगाबाद – उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नद्या ओसंडून वाहत आहेत. त्यातच खबरदारीचा उपाय म्हणून धरणांतून पाणी सोडल्याने नद्यांनी पुराची पातळी ओलांडली आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली. उस्मानाबादमधून जाणाऱ्या तेरणा आणि मांजरा नदीला पूर आला आहे.
संपूर्ण मराठावाड्यात पुरामुळे आतापर्यंत ३५ जणांचा जीव गेला असून ४ हजारहून अधिक जनावरे वाहून गेली आहेत. तर 20 लाख हेक्टरवर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही मराठवाड्यात आतापर्यंत 20 लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचं सांगितलं.
मांजरा धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथे ग्रामपंचायत सभागृहात पाणी शिरल्याने 125 जण अडकले आहे. इरला येथील प्राथमिक शाळेत 150 जणांना सुखरूप हलविण्यात आले असून पुराच्या पाण्यातून चौघा जणांची तेर येथून सुटका करण्यात आली. तर दाऊदपूर येथे अद्यापही सहाजण अडकलेले आहेत. पुणे येथून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातील सारसा गावातील लोक अडकले असल्याची माहिती आहे. पावसाचा वेग अजूनही जोरदार आहे. औरंगाबाद शहरातही गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर आणि कन्नड या दोन तालुक्यांना पुराचा फटका बसला असून शिऊर-आलापूर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. बनोटी, निंबायती, निंभोरा, सावळदबारा, पित्तूर या गावांत घरांची पडझड झाली असून काही घरांमध्ये पाणीही शिरले आहे.
सिल्लोड तालुक्यातील भराडी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धानोरा ते पूर्णवाडी या भागात पाणीच पाणी झाले आहे. पूर्ण नदीला पूर आल्याने काकडेवाडी या गावाचा संपर्क तुटला आहे. शिवनाटाकळी हे धरण भरल्यामुळे 16 हजार क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. कन्नड व गंगापूर तालुक्यातील नदीकिनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात 24 तासांत सावधानतेचा इशारा देण्यात आला असून अंबाजोगाई आणि केज येथील पूरस्थितीचा सामना करणाऱ्यांना सुखरूप हलविण्यात आल आहे. अंजनापूर, आपेगाव, इस्तळ येथेही काही नागरिक अडकून पडले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातही रात्रभर पाऊस सुरू आहे. पुरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातील जवान पोहोचत असून काही ठिकाणी पुरातील व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे.