कोल्हापूर – मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे चालू आहे. यामुळे कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या तीन टीम दाखल झाल्या आहेत.
कोल्हापूरच्या पश्चिम घाटमाथ्यावर अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडत आहे. याशिवाय गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा, शाहूवाडी परिसरातही मुसळधार पाऊस सुरु असल्याने राधानगरी धरणाचे 3 दरवाजे उघडले असून धरणातून 5684 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे पंचगंगेची पाणीपातळी 36 फुटांवर गेली आहे. तसेच जोरदार पावसाने 65 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे कोकणाकडे जाणारा कोल्हापूर- गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 4 राज्य मार्ग तर 15 प्रमुख जिल्हा मार्ग बंद करण्यात आले आहे.
जिह्यातील प्रमुख धरणांचे विसर्ग माहिती
१)राधानगरी धरण – विसर्ग 7112 क्युसेक
२) वारणा धरण – विसर्ग – 14851 क्युसेक
३)तुलसीधरण – विसर्ग – 1521 क्युसेक
४) कुंभी धरण- विसर्ग-1550 क्युसेक्स
५) कासारी धरण – विसर्ग-950 क्युसेक्स
६) दुधगंगा – विसर्ग-13200क्युसेक्स