गेले पाच महिने करोना विषाणू महासंकटाचा मुकाबला करणाऱ्या महाराष्ट्र राज्याला आता पुन्हा एकदा महापुराच्या संकटाचा सामना करावा लागेल, अशी लक्षणे दिसत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या चांगल्या पावसामुळे बळीराजा एकीकडे आनंदला असला तरी दुसरीकडे महापुराचे संकटही “आ’ वासून उभे आहे, असेच दिसते. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील पश्चिम भागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराने मोठा तडाखा दिला होता.
आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडून पुढे गेली आहे तर सांगलीत कृष्णा नदीही धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. तिकडे मुंबईसारख्या राजधानीच्या शहरातही अनेक ठिकाणी पाणी साचले असल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे.
महापुराचे संकट हे संपूर्णपणे नैसर्गिक असले तरी आता एकीकडे करोना विषाणूच्या महासंकटाशी मुकाबला करत असतानाच या महापुराच्या संकटाशी सामना प्रशासकीय यंत्रणेला आणि पोलिसांना करावा लागणार आहे. सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील गेल्या वर्षीचा अनुभव पाहता या वर्षी त्या भागातील नागरिक आधीच सतर्क झाले असल्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे प्राणहानी किंवा वित्तहानी होण्याचा धोका नसला तरी जनजीवन ठप्प होणारच आहे. गेल्यावर्षी जवळ जवळ दोन आठवडे कोल्हापूरला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. पुणे-बंगलोर महामार्ग पूर्णपणे ठप्प होता.
वाहतूक थांबली असल्यामुळे सर्व व्यवहार थंडावले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागापर्यंत मदत पोहोचणे अवघड होते. दुभती जनावरे आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अशीच काहीशी परिस्थिती सांगली जिल्ह्यातही होती. तेथे तर मदतकार्य करणारी बोट बुडून काही लोकांचा मृत्यू झाला होता. गेल्यावर्षीचा अनुभव गाठीशी असल्याने या दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांनी या वर्षी सावधगिरी बाळगली असल्याने नुकसान कमी होईल; पण गैरसोय मात्र होणारच आहे.
महापुराच्या संकटाची शक्यता लक्षात घेऊन एनडीआरएफच्या तुकड्या या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या असल्याने तातडीने उपाययोजना करणेही शक्य होणार आहे. सांगली असो किंवा कोल्हापूर, तेथील नद्यांना आलेल्या महापुरामुळे तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मात्र, राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला मात्र केवळ नियोजनाच्या अभावी जलप्रलयाशी सामना करावा लागला आहे, असे दिसते.
गेल्या दोन-चार दिवसांतील बातम्यांवर नजर टाकली तर गेले कित्येक वर्षे मुंबईतील जी ठिकाणे दरवर्षी पाण्याखाली जातात, ती ठिकाणे या वर्षीही पुन्हा पाण्याखाली गेली आहेत. यावर्षी पहिल्यांदाच दक्षिण मुंबईतील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. अशा प्रकारची घटना प्रथमच घडत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे, हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखे आहे.
पावसाळ्यापूर्वीच मुंबईतील नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने आतापर्यंत अनेक वेळा केला आहे. ही नालेसफाई शंभर टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचा दावाही मध्यंतरी मुंबईच्या महापौरांनी केला होता. ते जर खरे असेल तर यावर्षी पुन्हा एकदा मुंबईत त्या त्या ठिकाणी पाणी साचण्याचे कारण काय, याचे उत्तर महापालिका देऊ शकेल काय? मुंबई महानगर सध्या करोना विषाणूच्या महासंकटांशी झुंजताना मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्येही पाणी शिरल्याची दृश्य वृत्तवाहिन्यांनी दाखवली आहेत.
हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज पाहता येत्या पंधरा दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण अशाच प्रकारे तीव्र स्वरूपाचे राहणार आहे. म्हणजेच महापुराचे संकट अधिकच गडद होण्याचा धोका नाकारता येत नाही. खरेतर करोना विषाणूचे महासंकट यामुळे गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये दैनंदिन व्यवहारांवर मोठ्या प्रमाणावर बंधने आली असल्यामुळे कचरा निर्मितीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातही प्लॅस्टिकचा कचरा खूपच कमी झाला आहे, असे असतानाही मुंबईतील पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित का होत नाही, याचा शोध गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
दरवर्षी जरी जून महिन्यामध्ये पावसाला प्रारंभ होत असला तरी या वर्षी जून आणि जुलै या महिन्यांमध्ये म्हणावा तितका पाऊस झाला नव्हता. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून पावसाने जोर धरला आहे. जून आणि जुलै या महिन्यांमध्ये पावसाने बऱ्यापैकी दडी मारल्याने मुंबईतील प्रशासन गाफील राहिल्याने आताचे जलप्रलयाचे संकट उभे राहिले की काय, अशी शंका आल्याशिवाय राहात नाही.
गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता मुंबई आणि महाराष्ट्रातील काही विशेष ठिकाणी महापुरासाठी “रेड झोन’ म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. सरासरीपेक्षा जास्त पाऊस या भागांमध्ये झाला की, तेथे महापूर येणे जणू काही ठरूनच गेले आहे. हा इतिहास संपूर्ण रेकॉर्डसह प्रशासनाला माहीत असूनही महापुराचे संकट टाळण्यासाठी वा कमी करण्यासाठी काही विशेष उपाय योजले गेले आहेत, असे दिसत नाही.
शेतीच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पाऊसमान चांगले होणे महत्त्वाचे असले तरी हाच पाऊस नागरी जीवन मात्र विस्कळीत करून टाकत आहे. त्याला जबाबदार अर्थातच स्थानिक प्रशासन आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही. करोना महासंकटाचा मुकाबला करताना प्रशासन आणि पोलीस यांची ताकद त्या बाजूला केंद्रित झाली असल्याने आता महापुराचा मुकाबला करताना प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणेला विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे.
अर्थात, पोलीस प्रशासन आणि नागरी प्रशासन एकीकडे काम करत असताना सामान्य नागरिकांनीही त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे, तरच एकाच वेळी दोन संकटं उभी ठाकली आहेत त्याच्याशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य प्रशासनाला मिळू शकेल.