बावडा – इंदापूर तालुक्यात नीरा व भीमा नद्यांना पूर येऊन गेल्यानंतर जलचर प्राणी व सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पुराचे पाणी ओसरल्याने गावात जागोजागी चिखलाचे साम्राज्य पसरले होते. या दलदलीतून सरपटणारे प्राणी, नाग, खेकडे, विंचू आदींसह जलचर प्राणी मोकळ्या जागेत पडू लागल्याने ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे.
नीरा नरसिंहपूर येथे चिखलाच्या दलदलीतून कोब्रा जातीच्या नागाने अचानक दर्शन दिल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या नागास सर्पमित्राने शिताफीने पकडून गावाबाहेर सोडून दिले. त्यामुळे प्रशासनाने जलचर प्राण्यांपासून तसेच सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांपासून ग्रामस्थांचे रक्षण करावे, अशी मागणी दिंगबर डिंगरे व ग्रामस्थांनी केली आहे.