सुरू होऊ शकली नाही शाळा : परिसरातील झोपड्यांमध्ये गाळ
पिंपरी – सांगवी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेची अहिल्याबाई होळकर शाळेत अद्याप सुमारे 200 पूरग्रस्त आहेत. संबंधित रहिवाशांच्या झोपड्यांमध्ये गाळ साचला असल्याने ते अद्याप घरी गेलेले नाहीत. शहरातील इतर शाळा सुरू झाल्या असल्या तरी सांगवी येथील अहिल्याबाई होळकर शाळा सुरू होऊ शकली नाही. महापालिका प्रशासनाने त्यांची पर्यायी व्यवस्था करून शाळा सुरू करणे आवश्यक आहे.
मुळा नदीला पूर आल्याने मुळानगर झोपडपट्टी आणि मधुबन कॉलनी येथील रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे येथील सुमारे 750 रहिवाशांना महापालिकेच्या होळकर शाळेत स्थलांतरित करण्यात आले होते. पूर परिस्थितीमुळे सलग दोन दिवस शाळांना जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुट्टी जाहीर केली होती. आज मात्र, शहरातील शाळा पूर्ववत सुरू झाल्या. दरम्यान, रहिवाशांच्या झोपड्यांमध्ये गाळ साचलेला असल्याने 200 रहिवासी शाळेतच थांबले होते. ते गुरुवारी (दि. 8) घरी परतण्याची शक्यता आहे.
सांगवी येथील 200 रहिवाशांच्या झोपड्यांमध्ये गाळ साचला
असल्याने ते होळकर शाळेतच थांबले होते. गुरुवारी साफसफाई करून ते झोपड्यांमध्ये परततील.
– संतोष कांबळे, नगरसेवकमहापालिकेची होळकर शाळा आणि भाटनगर येथील शाळेत पूरग्रस्त स्थलांतरित रहिवासी अद्याप आहेत. त्यामुळे आज येथील शाळा सुरू होऊ शकल्या नाही. गुरुवारी (दि. 8) तेथील परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याविषयी मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत.
– ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभागशहरामध्ये सुमारे सहा हजार रहिवाशांना 20 ते 22 ठिकाणी स्थलांतरित केले होते. त्यातील 90 टक्के रहिवाशी त्यांच्या घरी माघारी परतले आहेत. महापालिकेच्या होळकर शाळेत सुमारे 750 रहिवाशांचे स्थलांतर केले. त्यातील अद्याप काही रहिवाशी शाळेतच आहेत. ते उद्या त्यांच्या घरी परततील.
– संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त