नवी दिल्ली – भारतातील वाढती करोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता ब्रिटनने भारताला ‘रेड लिस्ट’मध्ये टाकले होते. त्यामुळे भारतातून ब्रिटनला प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्यात आले होते. आता त्याला एअर इंडियाने चोख प्रत्युत्तर दिले असून ब्रिटनकडे जाणारी सर्व उड्डाणे 24 ते 30 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. ही माहिती एअर इंडियाच्या वतीने देण्यात आली आहे.
एअर इंडियाने सांगितले की, जे प्रवासी भारतातून ब्रिटनला जाणार होते त्यांना आता करोनाच्या निर्बंधामुळे प्रवास करता येणार नाही.तिकिटाच्या रिफंडबद्दल माहिती नंतर देण्यात येईल.
भारतातील करोनाचं संकट पाहता ब्रिटनकडून भारताची नोंद रेड लिस्टमध्ये करण्यात आली आहे. सदर यादीत नोंद झाल्यामुळे आता भारतीय आणि आयरिश नागरिकांना भारतातून ब्रिटनमध्ये जाण्यावर निर्बंध असतील. यासोबतच परदेशातून परतलेल्या ब्रिटनच्या नागरिकांनाही इथे एका हॉटेलमध्ये 10 दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागणार आहे.
ब्रिटनमध्ये भारतात आढळलेल्या संसर्गाच्या प्रकारचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी अधिक रुग्ण हे परदेशातून परतलेले आहेत. समोर आलेल्या रुग्णसंख्येच्या विश्लेषणानंतरच भारताचे नाव रेड लिस्टमध्ये समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.