फलटण – केंद्र शासनाने मंजूर केलेल्या आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामात अपुरे परिपत्रक व आदेश दाखवून आणि प्रशासकीय विभागाला हाताशी धरून फलटण तालुक्यात मनमानी नियमबाह्य बेकायेशीररित्या महामार्गाचे काम सुरू असून महामार्गाच्या सबंधित अनेक कामात त्रुटी ठेवत कोट्यवधीचा चुना लावण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. विकास हवा पण ठेकेदार आवरा, अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांच्यावर आली आहे.
फलटण तालुक्यातील सुरू असेलल्या पालखी महामार्गाच्या कामात रस्त्याच्या कामात काळी माती निघते. काही शेतकऱ्यांच्या शेतातून मुरूम काढून त्याठिकाणी ही काळी माती भरून दिली जाते. ज्या शेतातून मुरूम काढताना शेतकऱ्यांना गोड बोलून कागदपत्रे घेऊन अधिकृतपणे कोणताही परवाना नसताना शेतातून मुरमाचा उपसा होत असून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काळी माती नियमबाह्य पद्धतीने भरून देत आहेत. मुळात ही माती महामार्गाच्या कामाव्यतिरिक्त इतर ठिकाणी वापरण्यास मनाई असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने काळ्या मातीची विक्री होत आहे.
फलटण तालुक्यात पालखी महामार्गाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू असून या कामाकडे महसूल अधिकारी, लघुपाटबंधारे विभाग तसेच महामार्ग प्राधिकरण या सर्वांचे दुर्लक्ष असून महसूल अधिकारी विशेष करून होत असलेल्या अनधिकृत गौणखनिजा उपसा व विक्री याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. या दुर्लक्षामुळेच संबंधित ठेकेदाराचे फावले असून दिवसासह रात्रीही अनधिकृत बेकायदेशीर कामाचा सपाटा सुरूच आहे.
कुरवली बुद्रुक, बरड, सस्तेवाडी, नाईकबोमवाडी, भवानीनगर, राजुरी, विडणी, तरडगाव, काळज, धुळदेव, वडले, मिरढे व इतर गावांत सुरू असलेल्या मुरूम व मातीचा उपसाच्या शेतजमिनीची त्रयस्थ विभागांकडून चौकशी करण्याची आवश्यकता असून उपसा करण्यात आलेल्या शेतजमिनीचा पंचनामा व मोजमाप करण्याची गरज आहे. या तपासात बुडालेला कोट्यवधीचा महसूल उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गावांत महसूल विभागाच्या कोणत्याही परवानीशिवाय अनेक महिन्यापासून लाखो ब्रासचा मुरूम व मातीचा उपसा सुरू आहे.
काही परिपत्रके व आदेश दाखवून राज्य शासनाचा कोटीचा महसूल बुडवून मुरूम व मातीचा नियमबाह्यपणे उपसा सुरू आहे. पालखी महामार्गावर रस्त्यावर मुरुम टाकण्याऐवजी लाल माती व काळी माती टाकून काम धुमधडाक्यात चालू असून हजारो कोटी रुपये खर्च करुनदेखील या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असेल तर या कामाचा उपयोग काय, कामाचा दर्जा असेल तरच काम जास्त काळ टिकेल पण दर्जाहीन काम केल्याने सर्व पैसे पाण्यात जातील. या माती टाकलेल्या रस्त्यावर पाऊस झाल्यावर अनेक वाहने चिखलात गुंतून बसलेली पहावयाला मिळाली आहेत. त्यासाठी चांगल्या प्रतीचा मुरुम वापरुन दर्जात्मक काम होणे अपेक्षित आहे.
सध्या या महामार्गाच्या ओढ्यावरील पुलांची कामे चालू आहेत. पुलाचे काम करताना रस्त्याने वाहतूक चालू असताना ब्लास्टिंग केले जात असून या ब्लास्टिंगमुळे अनेकांच्या घरावर दगड उडाले असून अनेक घरांना तडे गले आहेत. त्यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल नागरिक विचारत असून ब्लास्टिंगमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनमा करून नुकसाभरपाईची मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.
या कामाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून बुडालेला व बुडत असलेला कोट्यवधीचा महसूल वसूल करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्याकडे होत आहे.