नवीन घर किंवा फ्लॅट घेणे आजकाल जिकरीचे झाले आहे. आपल्या बजेटमधला तोही सोयीच्या ठिकाणी फ्लॅट मिळणे ही बाब कठीण झाली आहे. दर शनिवार-रविवारी अनेक दांपत्य नवीन फ्लॅटच्या शोधात निघतात. मग ते मुंबई असो की पुणे. वृत्तपत्रातील जाहिराती, ओळखी किंवा नातेवाईकाचा संदर्भ घेत, मित्रांच्या सल्ल्यानुसार आपण फ्लॅट बघायला बाहेर पडतो. उच्चभ्रू वस्तीतील फ्लॅटचे दर कोटीच्या घरात असतात तर मध्यमवर्गीय सोसायटीतील घरे ही परवडणारी असतात.
शाळा, कॉलेज, रुग्णालय, दळणवळण व्यवस्था पाहून आपण संबंधित भागात फ्लॅट घेण्यास प्राधान्य देतो. सुदैवाने एखादा मनासारखा फ्लॅट मिळाला तर फारसा विचार आणि घासाघीस न करता तो फ्लॅट बुक करतो. नवीन घरात, सोसायटी, कॉलनीत राहायला गेल्यानंतर एकप्रकारे मनाला शांती लाभते. घरात राहायला गेल्यावर आता काही ताण नाही, असा विचार काही जण करतात. मात्र हक्काच्या घरात गेल्यावरही आपल्यासाठी अशी खूप कामे शिल्लक असतात की ते वेळेत किंवा मुदतीच्या आत करणे गरजेचे असते. यासंदर्भात चेकलिस्ट तयार करून ती कामे पार पाडावी लागतात. नवीन फ्लॅटचा ताबा घेताना बिल्डरने नमूद केलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता आहे की नाही याची तपासणी करणे, मालमत्ता कर, सोसायटीची स्थापना, महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र, बिल्डरचे पझेशन लेटर, वीजबिल, पाण्याची सोय आदी बाबींचा त्यात समावेश आहे. पाण्याच्या टाक्यांची स्थिती, वीजपुरवठ्याची व्यवस्था, लिफ्टच्या बॅटरी बॅकची स्थिती, वाहनतळासाठी पुरेशी जागा याही गोष्टी सर्वांनी एकत्र येऊन तपासल्या पाहिजेत. घर हस्तांतर करेपर्यंत बिल्डरने महानगरपालिकेचे सर्व कर, वीज भरले आहे की नाही, याचीही चाचपणी करून मूळ पावत्या हस्तगत करणे महत्त्वाचे आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की फ्लॅटमध्ये राहण्यासाठी गेल्यानंतर आपल्याला पाहव्या लागतात.
सोसायटीची स्थापना : गृहप्रकल्प नवीन असेल तर त्याठिकाणी हाऊसिंग सोसायटी स्थापन करण्याबाबत हालचाली कराव्या लागतील. विकसकाने गृहप्रकल्पातील 60 टक्के फ्लॅट विकले असतील तर अशा प्रकारची सोसायटीची स्थापना करता येते. जर फ्लॅटची पुरेशी विक्री झाली नसेल तर स्थानिकांनी पुढाकार घेऊन त्यासंदर्भात पावले उचलली पाहिजेत.
सोसायटीसाठी आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करणे, बिल्डर, मनपा आदींकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवून नोंदणी कार्यालयाच्या संपर्कात राहवे लागते. या बाबी झटपट होणाऱ्या नसतात. त्याला एक दोन वर्ष तरी लागतात. अशावेळी फ्लॅटमालकांनी वेळोवेळी पिच्छा पुरवून ही कामे पार पाडली पाहिजेत. सोसायटीची स्थापना झाल्यास संपूर्ण घरमालक हे जमिनीचेही मालक होतात. याशिवाय बिल्डरने सोसायटीला पुरेशा सुविधा दिल्या आहेत की नाही त्याची माहिती करून घेणे. यासाठी गरज पडल्यास सोसायटीतल सर्व मालकांची आणि विकसकांची बैठक बोलावून सोयीसुविधांबाबत विचारणा करायला हरकत नाही. काही अपूर्ण गोष्टी असतील तर त्या गोष्टी बिल्डरकडून पूर्ण करून घेतल्या पाहिजेत. वॉचमन, सीसीटीव्ही कॅमेराची यंत्रणा, पार्किंगचे अलॉटमेंट या बाबी स्पष्ट करून घेणे हिताचे ठरते.
– किर्ती कदम