अरुण गोखले
एखादी वस्तू ही वरकरणी दिसायला जरी एकसारखी असली तरी ती कोणाकडून प्राप्त झाली आहे. त्या मागचा हेतू काय? यावर तिचे पावित्र्य, तिचा स्वीकार आणि संग्रह अवलंबून असतो. एखादी वस्तू जळाली की तिची राख होते. राख हे अस्तित्व संपल्याचे, आकार निमाल्याचे प्रतीक असते. राख ही कोणी आपल्या उरी फार कवटाळून बसत नाही अगदी आपण आपल्या प्रिय जनांचीही अस्थीरक्षा ही शेवटी पाण्यातच विसर्जित करतो.
पण राखेसारखाच दुसरा आपल्या हाती येणारा पदार्थ म्हणजे विभूती किंवा भस्म. विभूती आणि भस्म ह्या दोन्ही गोष्टी आपल्या धर्माने पवित्र मानलेल्या आहेत. त्यांच्या स्वीकारात आपले कल्याण होते. साधू संत, सत्पुरुष ह्यांच्या हातून मिळालेल्या विभूती किंवा भस्माने जीवांचा सर्वार्थाने उत्कर्ष, उद्धार आणि त्यांचे कल्याण झाल्याचे जसे अनेक पौराणिक दाखले आपल्याकडे आहेत. तसेच आजही आपल्याला तसे काही बोलके अनुभव प्रत्ययाला येतही आहेत. भस्म हे वैराग्याचे प्रतीक असून त्याचा भगवान शिवशंकर, श्री दत्तात्रय ह्यांनी स्वीकार केल्याचे आपल्याला माहीत आहेच.
एखाद्या सिद्ध योग्याची भस्मांकित काया ही त्याच्या अंतरंगीच्या वैराग्याची, पावित्र्याची शुद्धतेची साक्ष असते. भस्म विलेपन देवाला आणि स्वत:ला हा आपल्याकडचा एक पवित्र संस्कार आहे. भस्म कसे का आणि कशासाठी लावायचे त्याचे फायदे काय ह्या संदर्भात शिवलीलामृत, श्री गुरूचरित्र यासारख्या ग्रंथांत माहिती लिहून ठेवलेली आहे. श्री क्षेत्र गाणगापूर येथे तर आजही भस्माचा एक डोंगर आहे. यज्ञकुंडातील, अग्निहोत्रातील भस्म हे शुद्ध, पवित्र मानले जाते.
एखाद्या सिद्धाच्या हातून मिळालेल्या विभूतीत किती मोठे सामर्थ्य असते ह्याची साक्ष नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील गोरक्षजन्माची कथा आपल्याला सांगून जाते.
अगदी अलीकडच्या काळात म्हणजे शे-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या काळात शिर्डीच्या श्री साई नाथांच्या हातचा दिव्य उदीचा प्रसाद लाभलेल्या काही पिढ्या आजही आपल्याला पाहायला मिळतात आणि बाबांच्या हातच्या उदीने घडविलेल्या चमत्कारांची महतीही सांगतात. विभूती भस्म हे आजही मठ आणि मंदिरातून ठेवलेले जसे आपल्याला पाहायला मिळते, तसेच त्याचा सश्रद्धेने स्वीकार करणारे, ती विभूती भाळी लावणारे आणि प्रसाद म्हणून भक्षण करणारी भाविक भक्तमंडळीही आपण आजही पाहतो. अशी विभूती किंवा भस्म हे कपाळी लावीत असताना आपण त्याचा बोध आपल्या मनासही लावून घ्यायचा असतो.