पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण
नगर – जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली. त्याचबरोबर रस्ते, जलसंधारण, कृषी, आरोग्य आणि सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन विकासाच्या कामांना गती देण्यात आल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण ना. शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे-पाटील, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशु सिंधू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.
ना. शिंदे म्हणाले, दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्यशासन आणि जिल्हा प्रशासनाने सक्षमपणे आणि तात्काळ निर्णय घेतले. दुष्काळ जाहीर केलेल्या गावातील 6 लाख 79 हजार 436 शेतकऱ्यांना 373 कोटीहून अधिक अनुदानाचे वितरण केले. आवश्यक तेथे मागणीनुसार चारा छावण्या सुरु करण्यात आल्या. रोजगार हमी योजनेत 34 हजार 254 कामांचे शेल्फही तयार केले.
पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेतून एकूण 96 गावांसाठी 80 कोटी, जलस्वराज्य मधून 45 कोटी निधी देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 3 लाख 5 हजार 700 शेतकऱ्यांना 1 हजार 27 कोटी 67 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानात मागील 4 वर्षात 1 हजार 35 गावांत 38 हजार 34 एवढ्या कामांतून 2 लाख 25 हजार 597 टीसीएम पाणीसाठा निर्माण करण्याची क्षमता तयार झाली तर 4 लाख 51 हजार 196 हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाले.
तेहतीस कोटी वृक्षलागवड मोहिमेत आतापर्यंत 70 लाख 95 हजार 968 इतक्या रोपांची लागवड झाल्याचे सांगून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा अंतर्गत रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरणासाठी भरीव निधी प्राप्त झाला तसेच जिल्हा नियोजन समितीचा 570 कोटी रुपयांचा अंतिम आराखडाही आपण मंजूर केल्याचे ते म्हणाले.
ध्वजारोहण समारंभानंतर ना. शिंदे यांनी संचलनाची पाहणी केली. त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच पोलीस दलातील विशेष तपास, गुन्हे उघड अशी चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
जिल्हा आदर्श तलाठी पुरस्काराचे वितरण, राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचा गौरव आणि हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची याअंतर्गत निवड झालेल्या बचतगटांचा सत्कार यावेळी करण्यात आला. महिला व मुलींच्या संरक्षणासाठी जिल्हा पोलीस दलाच्या सारथी या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी या सेवेचा शुभारंभ केला. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.