जिल्हा परिषदेत 80 जणांची संभाव्य निवड यादी जाहीर; इच्छुकांच्या डोळ्यात आनंदाश्रू
सातारा – सातारा जिल्हा परिषदेमध्ये 2014 पासून रखडलेल्या अनुकंपा भरतीला अखेर मुहुर्त मिळाला. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी याबाबत पुढाकार घेऊन पाच वर्षे रखडलेली 80 जणांची संभाव्य निवड यादी शुक्रवारी जाहीर केली. न्याय मिळाल्याने अनेक अनुकंपाधारकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहाय्यक, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आदी पदांची अनुकंपा भरती 2014 पासून रखडली होती. प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या हरकती, त्रुटींमुळे अनुकंपा भरती प्रक्रिया रखडली होती. याबाबत जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्यांनी वारंवार आवाज उठवला होता.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही अनुकंपाधारकांना तात्काळ नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले होते. डिसेंबरअखेर त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी अनुकंपा भरती प्रक्रियेत बारकाईने लक्ष घातले. प्रतीक्षा यादी, त्रुटींबाबत माहिती घेऊन त्याचे निरसन करण्याचा प्रयत्न केला.
गेली पाच वर्षे भरती प्रक्रिया रखडल्याने इच्छुकांचे होणारे नुकसान विचारात घेऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लावत जाधव यांनी 80 जणांची संभाव्य निवड यादी जाहीर केली. याबाबत अनुकंपाधारकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेत जाऊन मनोज जाधव यांचे अभिनंदन केले. यावेळी अनेक इच्छुकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.
कुटुंबातील कर्ता पुरुष जाण्याने कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शासकीय सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या जागी त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत भरती करुन घेतले जाते. 2014 पासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. या प्रक्रियेतील त्रुटी दूर झाल्याने 80 संभाव्य इच्छुकांची निवड यादी जाहीर केली आहे. लवकरच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
मनोज जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी