सोलापूर – पंढरपूरची वारी हा एक अद्भूत सोहळा आहे. दिंड्या-पताकांबरोबर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या जयघोषात लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात. माउलींच्या पालखीनेही आज साताऱ्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षततेसाठी पोलीस प्रशासनानेही कंबर कसली आहे. यासाठी महाराष्ट्रभरातून तब्बल साडेपाच हजार पोलिसांचा फौजफाटा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या नियोजनाचा आढावा सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडून प्रभातच्या प्रतिनिधींनी जाणून घेतला आहे.
सोलापूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पंढरपूरपर्यंत सुरक्षित पोहचविणे ही आमची जबाबदारी असते. यंदा रस्ते अपघात टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक भाविकांची सुरक्षितता प्रदान करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहेच परंतु, त्याचबरोबर या कामाचे पुण्यही पोलिसांना लाभत असते. हे आमच्यासाठी भाग्याचे आहे, अशी भावना पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली.