नवी दिल्ली – येथे पोलिसांनी चकमकीनंतर पाच दहशतवाद्यांना अटक केली. त्यात तीन काश्मिरी तर दोन पंजाबमधील आरोपींचा समावेश आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयशी संबंधित असल्याचा संशय आहे. खलिस्तान आणि काश्मिरमधील दहशतवादाला चालना देण्याचा पाकिस्तानचा कट या कारवाईमुळे उघड झाला आहे.
पोलिसांच्या विशेष शाखेचे उपायुक्त प्रमोद खुशवाह यांनी या कटाची माहिती दिली. ते म्हणाले, शौर्यचक्र विजेत्या बलविंदरसिंग यांच्या हत्येतही पंजाबमधील अटक केलेल्या दोघांचा सहभाग आहे. पंजाबमधील दोन कुख्यात गुन्हेगारांना तीन काश्मिरी काही रक्कम देणार असल्याची पक्की खबर सोमवारी सकाळी मिळाली. त्यानुसार लक्ष्मीनगर भागात पोलीस कारवाईसाठी गेले. त्यावेळी या आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.
पोलिसांनी त्यांना चोख प्रत्यूत्तर देत त्यांना पळून जाण्याची कोणतीही संधी न देता ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, एक किलो हिरॉईन आणि एक लाख रुपयांची रोकड जप्त केली. काही जणांची हत्या घडवण्यासाठी हे तीन काश्मिरी या दोघांना पैसा पुरवत होते. ते अमली पदार्थ विकत असत. त्यातून मिळणारा पैसा ते पंजाबमधील दहशतवादी कारवायांसाठी देत असत, असे सांगून खुशवाह यांनी स्पष्टीकरण दिले की, या अटक केलेल्या लोकांचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी काडीचाही संबंध नाही.
अटक केल्या पंजाबमधील दोघे गुन्हेगारी टोळींमधील आहेत. तर काश्मिरातील तिघांचा हिज्बुल मुजाहिद्दीनशी थेट संबंध आहेत. खलिस्तानी आणि काश्मिरातील दहशतवादाशी आयएसआयच्या संबंधांवर या अटकेने प्रकाशझोत पडला आहे.
नोटाबंदीमुळे बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा कणा मोडल्यानंतर आयएसआय भारतातील दहशतवादी कारवायांसाठी अंमली पदार्थ विक्रीच्या माध्यमातून अर्थपुरवठा करत आहे. पंजाबमधील खलिस्तानवादी फुटीरता चळवळ जीवंत आहे, हे भासवण्यासाठी आयएसआय हे गुन्हेगारी टोळ्यांची मदत घेत आहे. ही टोळी सुखबिहारीवाल चालवत आहे. सध्या तो आखाती देशातून या कारवाया करण्यसाठी शस्त्रांची तजवीज करत असतो.