नवी दिल्ली, दि. 27 – देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांची मतमोजणी येत्या 2 मे रोजी होणार आहे. त्या दिवशी निकाल जाहीर झाल्यानंतर आणि नंतरही तेथील विजयी उमेदवारांना विजयी मिरवणुका काढण्यावर निवडणूक आयोगाने बंदी आदेश जारी केला आहे.
करोनाची दुसरी लाट निवडणूक आयोगामुळेच निर्माण झाल्याचा ठपका काल मद्रास उच्च न्यायालयाने आयोगावर ठेवला होता. या हायकोर्टाने निवडणूक आयोगावर अन्यही कडक शेरेबाजी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाने हे दक्षतेचे निर्बंध जारी केले आहेत.
विजयी उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विजयाचे प्रमाणपत्र नेण्यासाठी आपल्या बरोबर दोन पेक्षा अधिक व्यक्ती नेऊ नयेत असेही आयोगाने संबंधीतांना बजावले आहे. मतमोजणीच्या ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये मोठे अंतर राखण्याची सूचनाही आयोगाकडून जारी करण्यात आली आहे.