पुणे – राज्यातल्या खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आघाडी सरकारने राज्याचे स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करण्यात आले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप उमटविणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत वर्ग एकच्या पदावर नोकरीच्या संधी दिल्या आहेत. राज्यातल्या खेळाडूंसाठी शासन सेवेत 5 टक्के कोटा राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय आघाडी सरकारने घेतला, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे पीवायसी जिमखाना येथे आयोजित पुरस्कारार्थी खेळाडूंच्या गौरव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, अभिमन्यू पवार, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीव राजे निंबाळकर, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू श्रीरंग इनामदार, सारिका काळे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, प्रत्येकाने एकतरी खेळ खेळलाच पाहिजे. खेळ तरुणांना जिंकण्यासाठी आवश्यक असलेला उत्साह आणि ऊर्जा देतो. शरिराची व मनाची जडण-घडण खेळांच्या माध्यमातून होत असते. आयुष्यात खेळांमुळे नेतृत्वंगुणांना वाव मिळतो. टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईल समोर बसणाऱ्या आजच्या युवा पिढीने मैदानी खेळाकडे वळण्याची आवश्यकता आहे.
गेल्या काही दिवसात क्रिकेट सोबतच इतरही सांघिक आणि वैयक्तिक खेळात राज्यातल्या अनेक खेळाडूंनी आपली चमक दाखविली आहे. यामध्ये खो-खोच्या खेळाडूंचा मोठा वाटा आहे. भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या संघाने सातव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
खो-खो च्या राज्य संघटनेने यापुढे शहरी भागात खो-खो खेळ पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शहरी भागातील क्रीडा मंडळे, क्लब कमी होत असताना त्यांना पुन्हा या प्रवाहात आणण्यासाठी राज्य संघटनेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आशियाई पातळीवर खो-खो खेळाची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम राज्य संघटनेवर आहे. त्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवावेत. खो-खोसह कबड्डी, कुस्ती सारख्या खेळांना प्रोत्साहन आणि सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.