कार्यालयाचा बेकायदेशीर ताबा घेत 25 हजारांचा अपहार
सावित्रीबाई फुले विकास संस्थेच्या संस्थापिकेने दिली तक्रार
नारायणगाव – नारायणगाव ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत असलेल्या सावित्रीबाई फुले विकास संस्थेच्या कार्यालयाचा बेकायदेशीर ताबा घेऊन संस्थेचे कार्यालयीन साहित्य व 52 हजार रुपयांच्या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.
सरपंच योगेश पाटे, राजेश बाप्ते, गोपी खंडे, बाळासाहेब औटी, गणेश पाटे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. तर सावित्रीबाई फुले विकास संस्थेच्या संस्थापिका तथा माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री बाबुराव बोरकर (वय 60, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. अर्जुन घोडे पाटील म्हणाले की, 14 मे 2019 रोजी दुपारी दोनच्या सुमारास नारायणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश पाटे यांच्या सांगण्यावरून ग्रामपंचायत सदस्य राजेश बाप्ते, गणेश पाटे, ग्रामपंचायत कर्मचारी गोपी खंडे, बाळासाहेब औटी हे ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन आले व सावित्रीबाई फुले विकास संस्थेच्या कार्यालयातील दोन कपाटे, लाकडी टेबल, 15 खुर्च्या, दोन शिलाई मशीन, पुस्तकांचा सेट, महत्त्वाच्या फाइल्स, बचत गटाचे रजिस्टर, कपाटात ठेवलेले किराणामालाची बिले देण्याकरिता ठेवलेले रोख 52 हजार रुपये तसेच चिल्लरचे तीन डबे, एफडीच्या पावत्या असे सर्व साहित्य ट्रॉलीमध्ये भरून इतरत्र कोठेतरी घेऊन गेले आहेत. तसेच त्यांनी संस्थेच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे कुलूप लावून आम्हाला कार्यालयात जाण्यास मज्जाव केला असल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. पुढील तपास तपास अर्जुन घोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे हे करीत आहे.