मुंबई: राज्यातील महत्वाच्या नेत्यांसह 45 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी दोनच दिवसांपूर्वी राजीनामे दिले असतानाच, मुंबईतही वंचित बहुजन आघाडीत मोठी फूट पडली आहे. मुंबईमधील वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासह एकूण 500 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी अशा एकूण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत विक्रोळी पश्चिमेकडील कैलास कॉम्प्लेक्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. यामुळं वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका बसणार आहे.
राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीसह भाजपला पर्याय निर्माण करण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नांना खीळ बसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अकोला पाठोपाठ राज्यातील महत्वाच्या अशा मुंबई आणि उपनगरांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक बंड केल्यानं ‘वंचित’ला हा मोठा हादरा बसल्याचं मानलं जात आहे.