गुवाहाटी – आसामला शनिवारी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.2 इतकी नोंदली गेली. ईशान्य विभागातील 24 तासांतील तो भूकंपाचा पाचवा धक्का ठरला.
सुदैवाने त्यामध्ये कुठलीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. आसाममध्ये शुक्रवारी दोन भूकंपांची नोंद झाली. त्यातील एक 4.1 तीव्रतेचा होता. त्याशिवाय, मणिपूर आणि मेघालयलाही शुक्रवारी भूकंपाचा धक्का बसला.
रिश्टर स्केलवर मणिपूरमधील भूकंपाची तीव्रता 3, तर मेघालयातील भूकंपाची तीव्रता 2.6 इतकी नोंदली गेली. ईशान्य विभाग भूकंपप्रवण मानला जातो. त्यामुळे त्या विभागातील राज्यांना वारंवार भूकंपाचे धक्के बसतात. दरम्यान, भूकंपाच्या ताज्या मालिकेत कुठलीही हानी न झाल्याने ईशान्य विभागाला दिलासा मिळाला.