नवी दिल्ली: दिल्लीत जुलै अखेरपर्यंत साडे पाच लाख करोनाग्रस्त नागरीक असतील हे विधान आपले नव्हते तर केंद्र सरकारनेच हा आकडा व्यक्त केला होता असा खुलासा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे.
ते म्हणाले की भारत सरकारच्या पोर्टलवरही हा मुद्दा ठळकपणे नोंदवला आहे. लोकांना जागृत करण्यासाठीच मी हा संदर्भ दिला होता हा माझ्या मनाचा आकडा नव्हता असेही सिसोदिया यांनी म्हटले आहे.
मनिष सिसोदिया यांनी साडे पाच लाखांचा आकडा देऊन दिल्लीतील जनतेला घाबरवून टाकले आहे असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रीया देताना त्यांनी हा खुलासा केला.
ते म्हणाले की सिसोदिया यांनी लोकांमध्ये घबराट निर्माण केल्याने केंद्र सरकारला दिल्लीतील स्थितीत हस्तक्षेप करावा लागला आहे असे अमित शहा यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना सिसोदिया म्हणाले की दिल्लीकरांची सुरक्षा हा आमच्यासाठी सर्वात महत्वाचा विषय आहे. हे काम कोणतेही सरकार एकट्याने करू शकत नाही.या संकटाकाळात जिथून मदत मिळते आहे ती घेऊन लोकांना सुरक्षित करणे
महत्वाचे आहे. याचे क्रेडिट कोण घेतो आहे यावर आम्हाला काहीच बोलायचे नाही असेही त्यांनी आज एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले.
दिल्लीतील सध्याच्या वैद्यकीय स्थिती बाबत बोलताना ते म्हणाले की आज दिल्लीत करोनाचे जितके रूग्ण आहेत त्याच्या दुप्पट बेड्स आज उपलब्ध आहेत. आज दिल्लीत करोनाच्या सहा हजार ऍक्टिव्ह केसेस आहेत आणि 15 हजार बेडस उपलब्ध आहेत.