गोरखपूर – पत्नी रागाच्या भरात माहेरी गेल्याच्या कारणावरून एका पतीने भयानक टोकाचे पाऊल उचलले आहे. पतीने दोन मुलांसह घरात जाळून घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील गीडा येथील सराया गावात घडली आहे.
मदन कन्नोजिया, वय 36 असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव असून मुलगी अन्नपूर्णा, वय 7, मुलगा शेषनाथ, वय 5 असे मुलांची नावे आहेत. या घटनेप्रकरणी मृत मदन यांच्या भावाने पोलीसात तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये पत्नीसोबतच्या वादामुळे मदन नाराज असल्याचे सांगितले आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, मदन यांनी मुलगी अन्नपूर्णा व मुलगा शेषनाथ यांना घरात घेऊन घराचे दार बंद केले. त्यानंतर सिलेंडरी नळी बाहेर काढून आग लावली. या आगीची माहिती नातेवाईकांना व शेजाऱ्यांना कळताच त्यांनी दार तोडले व आत गेले मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला.