पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा एजन्सी नेमण्याच्या प्रक्रियेत अडकली आहे. त्यामुळे एजन्सीचा निर्णय तातडीने घेत कुलगुरुंनी स्वत:च्या अधिकाराचा वापर करीत परीक्षेची भूमिका स्पष्ट करावी आणि विद्यार्थ्यांसमोरील परीक्षेचा संभ्रम दूर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.
विद्यापीठाच्या प्रथम सत्राची परीक्षा दि. 15 मार्चपासून घेण्याचे नियोजन होते. मात्र, आता ही परीक्षा एप्रिलमध्ये होणार असल्याची चिन्हे आहेत. परीक्षेचे काम देण्यासाठी एजन्सीचा अद्यापही निर्णय अंधातरी आहे. त्यामुळे ही परीक्षा एक महिना पुढे जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
अशा परिस्थितीत परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होणार नाही, हे निश्चित असताना त्याबाबत विद्यापीठाकडून भूमिका जाहीर केली जात नाही. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
परीक्षेच्या निर्णयाचे गौडबंगाल
विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची यापूर्वी झालेल्या बैठकीत परीक्षेचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना देण्यात आले आहे. असे असूनही कुलगुरू परीक्षेच्या एजन्सीचा निर्णय स्वत:च्या अधिकारात का घेत नाहीत, असा प्रश्न आहे. एजन्सी जुनी की नवी नेमायची हा निर्णय घेण्यास विद्यापीठास इतका विलंब होत आहे, यामागचे नेमके काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विद्यापीठाने भूमिका स्पष्ट करावी
ऐन दहा दिवसांवर परीक्षा येऊन ठेपली असतानाही परीक्षेसंदर्भात एजन्सी नेमण्यावर अद्याप एकमत नाही, ही बाब आश्यर्यकारक आहे. एजन्सी कोणतेही नेमा, पण निर्णय तातडीने होणे अपेक्षित असताना इतका वेळकाढूपणा विद्यापीठाकडून अपेक्षित नाही. परीक्षेसंदर्भात ठोस निर्णय घेत विद्यार्थ्यांसमोरील संभ्रम दूर करावा. अन्यथा प्रथम व द्वितीय सत्राची परीक्षा एकत्रित घ्यावी, अशी मागणी युक्रांदचे कमलाकर शेटे यांनी कुलगुरुंकडे केली आहे.