नवी दिल्ली – करोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पसरत असलेल्या कोव्हिड19 च्या फैलावाला प्रतिबंध घालण्यासाठी जगभर विविध ठिकाणी लसींबाबत संशोधन सुरु असून भारतात भारत बायोटेक ही कंपनीही प्राधान्याने ही लस तयार करण्याच्या प्रयत्नांत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार सर्वात निर्धोक आणि पूर्णता: भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस वर्ष 2021 च्या जून महिन्यापर्यंत बाजारात येऊ शकेल. नुकतीच या कंपनीच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मिळाली असून तिसऱ्या टप्प्यातील चाचणी येत्या नोव्हेंबरपासून सुरू होऊ शकते अशी माहिती मिळाली आहे.
कोरोनाचा विळखा जनगभरात वाढत आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण अजूनही दररोज 50 हजारहून अधिक वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाची लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी सर्वजण प्रतीक्षा करत आहेत. ऑक्सफर्ड आणि सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या लसीची चाचणी देखील सध्या तिसऱ्या टप्प्यात सुरू आहेत. हैदराबादस्थित भारत बायोटेक या कंपनीने 2 ऑक्टोबर रोजी डीसीजीआयकडे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर या कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. 12 ते 14 राज्यातील 20 हजारहून अधिक नागरिकांवर या लशीची चाचणी होणार आहे. मार्च अखेरपर्यंत या लसीचे सर्व परिणामांची माहिती मिळू शकते त्यामुळे जूनपर्यंत ही लस उपलब्ध करून देता येऊ शकते असं भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने दावा केला आहे.
कोरोना लसीच्या निर्मितीमधील मोठा भाग हा भारतात तयार होण्याची शक्यता असल्याचं बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रमुख मार्क सुजमन यांनी सांगितलं होतं. भारत लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत असून पुढील वर्षापर्यंत एखादी लस बाजारात येण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मजबूत खासगी क्षेत्रामुळे हे शक्य असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रशियाने आपल्या स्पुटनिक-व्ही या लसीची घोषणा देखील केली होती. यावेळी या लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीचा अहवालही जारी करण्यात आला नाही आणि आता या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. पहिल्या दोन टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्याची माहिती जर्नल लॅसेंटने दिली आहे.