नगर – केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. एक जुलैपासून देशातील 256 जिल्ह्यात हे अभियान राबविले जात असून पहिल्या पंधरवड्यात देशपातळीवर 9 वा तर राज्यातील आठ जिल्ह्यात अभियान अंमलबजावणीत नगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक गाठला आहे.
जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, राहुरी आणि संगमनेर तालुक्यात हे अभियान राबविले जात आहे. जलसंधारण व रेनवॉटर हार्वेस्टींग, परंपरागत जलस्त्रोतांचे नूतनीकरण बोअरवेल व विहीर पुनर्भरण, पाणलोट क्षेत्रविकास आणि वृक्षलागवड आदी बाबींवर या अभियानात भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणांनी कामास सुरुवात केली आहे. लोकसहभाग या अभियानात मिळावा, यासाठी तालुका व ग्रामपातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. अनेक ठिकाणी लोकसहभाग, विविध संस्था-संघटनांच्या पुढाकाराने वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. द्विवेदी यांनी आज विविध यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक घेऊन शासकीय कार्यालयाच्या इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टींग आणि अभियानाच्या विविध उपक्रमात लोकसहभाग, वृक्षलागवड, बोअर व विहीर पुनर्भरण, शोषखड्डे घेणे आदी कामांबाबत नियोजन आराखड्यावर चर्चा केली. जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे, उपस्थिती होती.